Navneet Rana & Ravi Rana
Navneet Rana & Ravi Rana Sarkarnama
मुंबई

राणा दाम्पत्यावर तब्बल 23 गुन्हे! ठाकरे सरकारने कुंडलीच काढली बाहेर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणींमध्ये वाढ होत चालली आहे. या दोघांनी जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. पण सरकारने त्यांच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे. त्यासाठी सरकारकडून राणा दाम्पत्याची कुंडलीच बाहेर काढली आहे. दोघांवर ठिकठिकाणी एकूण 21 गुन्हे दाखल असून त्यातील काही गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी सरकारच्यावतीने न्यायालयात करण्यात आली आहे.

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज (ता. 29) सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारच्यावतीने अॅड. प्रदीप घरत (Pradeep Gharat) यांनी न्यायालयात लेखी स्वरूपात सरकारची बाजू सादर केली. तर राणांच्या वतीने त्यांच्या वकीलांनीही जामीनाची मागणी करत बेकायदेशीरपणे त्यांना अटक केल्याचे सांगितले. पण न्यायालयाने आता यावर शनिवारीही सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे राणांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. शनिवारी सरकारच्यावतीने युक्तीवाद केला जाणार आहे. (Navneet Rana Latest Marathi News)

अॅड. प्रदीप घरत यांनी सांगितले की, आज लेखी युक्तीवाद सादर केला आहे. त्यानंतर न्यायालय जी तारीख देईल. त्यानुसार आम्ही युक्तीवाद करू. त्यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. पण त्यांच्याविरोधातील कलम गंभीर आहे. राजद्रोहाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा आहे. त्यांना जामीन झाला तर दबाव येऊ शकतो. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. रवी राणा यांच्याविरोधात 17 आणि नवनीत राणा यांच्याविरोधा सहा गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. नवनीत राणा यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रांचा गुन्हा आहे. बोरीवली येथून त्यांनी खोटा शाळेचा दाखला मिळवला होता. हे मुद्दे न्यायालयासमोर मांडून जामीनाला विरोध केला जाणार असल्याचे घरत यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. त्यासाठी आदल्यादिवशी ते दोघेही त्यांच्या खार येथील निवासस्थानी आले होते. पण पोलिसांनी त्यांना मातोश्रीसमोर न जाण्याची नोटीस बजावली होती. पण यादरम्यान शिवसैनिकांच्या राणांच्या घरासमोर जोरदार आंदोलन केले. दिवसभर मोठा राडा झाला होता. यादरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याठिकाणी घरचं जेवण मिळावं, अशी मागणी राणांनी गुरूवारी न्यायालयात केली आहे.

राणांकडून पोलिसांवर गंभीर आरोप

आपण मागासवर्गीय असल्याने खार पोलीस ठाण्यात आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, अशी गंभीर तक्रार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. या आरोपांबाबत आता नवनवीन माहिती समोर येत आहे. मुंबई पोलीस आयुक्तांकडून पोलीस ठाण्यातील चहा पितानाचा व्हिडीओ, राणांच्या वकिलांनी नंतर केलेला खुलासा अन् आता राणांनीच न्यायालयात दिलेली माहिती यावरून आता या प्रकरणात पुन्हा ट्विस्ट आला आहे.

लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांना राणांनी पत्र लिहिलं आहे. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी मंगळवारी राणा दाम्पत्याचा पोलीस ठाण्यात चहा पितानाचा व्हिडीओ ट्विट केला. पण काही तासांतच राणांचे वकील रिझवान मर्चंट यांनी राणांना दिलेली वागणूक सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील असल्याचा दावा केला आहे. मर्चंट यांच्या या दाव्यामुळे प्रकरणाला पुन्हा एका वेगळं वळण लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT