Sharad Pawar, Gopinath Munde Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar And Gopinath Munde : गोपीनाथ मुंडेचे 'ते' शब्द खरे ठरले; पवारांबाबत केलेल्या विधानाचा व्हिडिओ व्हायरल..

सरकारनामा ब्यूरो

NCP Crisis In Maharashtra : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला वर्षपूर्ती होऊन काही तासच उलटले आहेत. त्यातच राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. आता महाविकास आघाडीत मोठा भाऊ म्हणून मिरवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीतील ३५ आमदारांना सोबत भाजपा शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. (Latest Political News)

अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात पुन्हा एखदा चुलते-पुतण्यातील राजकीय वाद सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापुर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांचे पुतणे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर धनंजय मुंडे आपले चुलते भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात गेले. धनंजय मुंडे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. चुलत्या-पुतण्यात भांडण लावण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करत असल्याचा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला होता.

अजित पवार यांनी रविवारी (ता. २ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुमारे ३५ आमदार घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे एका भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या भाषणात मुंडे यांनी पवार यांच्यावर घणाघात केला आहे. धनंजय मुंडे सोडून गेल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी पवार यांच्यावर टीका केली होती. मुंडे म्हणाले होते की, "काय झालेय या राज्यातील सगळ्या पुतण्यांना? बाळासाहेबांना त्रास झाला. मला त्रास झाला. शरद पवार तुमची बारी आलेली दिसतेय आता..."

शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षांतर्गत काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवली होती. त्यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. त्यावेळी अजित पवार नाराज असल्याची चर्चा झाली होती. यानंतर मला विरोधी पक्षनेते पद नको होते. आता मला पक्षकार्य करायची संधी द्या, असे म्हणत अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर दावा ठोकला होता. यानंतर रविवारी (ता. २) अजित पवार यांनी बंड केले आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत. घड्याळ चिन्हावरच आम्ही निवडणुका लढणार आहोत. देशपातळीवरील सध्या जी परिस्थिती आहे, त्याच्या विचार केला असता विकासाला महत्व दिले पाहिजे. हे सर्व सहकाऱ्यांचे मत होते. नऊ वर्षांपासून मोदी सरकार चांगले काम करीत आहे. त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मोदींमुळे देशाचा विकास होत आहे. राज्यामध्ये विकासाला महत्व दिले पाहिजे. त्यामुळे राज्यात मजबूत खंबीर नेतृत्वाची गरज आहे. केंद्रीय निधी कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केला जाईल."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT