Mumbai News : महाराष्ट्रात हिंदीसक्तीच्या मुद्द्यांवरुन राजकारण तापलं आहे.विशेष म्हणजे हिंदीसक्तीचाच हाच मुद्दा उचलून धरत अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या उद्देशानं पहिलं पाऊल टाकलं आहे. राज्यातील हिंदी सक्तीविरोधात येत्या पाच जुलै रोजी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चा काढणार आहेत. आता या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ठाकरे बंधूंच्या राज्यातील हिंदीसक्तीच्या मोर्चाला पाठिंबा दर्शवणारं पत्रक काढलं आहे. या मोर्चाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’पक्षाचा जाहीर पाठिंबा दर्शवत मोठ्या संख्येने त्यात सहभागी होण्याचं आवाहनही या पत्रकाद्वारे करण्यात आलं आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षानं महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020)’ अंतर्गत प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदीसक्तीला विरोध करण्यासाठी,आणि प्राथमिक शिक्षण प्रामुख्याने मातृभाषेतूनच व्हावे या मागणीसाठी येत्या शनिवारी,5 जुलै 2025 रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत पुकारण्यात आलेल्या मोर्चाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा जाहीर पाठिंबा देत असल्याचं पत्रकात म्हटलं आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पत्रकात महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) या धोरणांतर्गत शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात महाराष्ट्रात मराठी भाषाभिमानाचे ठिकाणी जनमत तयार होत असल्याचं म्हटलं आहे.
अनेक विद्यार्थी,पालक,शिक्षक,शिक्षणतज्ज्ञ,भाषातज्ज्ञ आणि सर्व भाषाभिमानी शिक्षकवृंद यांच्या पातळीवरून राज्यभरातून विविध आशयाचे निवेदने येत आहेत.परंतु,हे सरकार कोणालाही जुमानत नाही,हे सरकार हिंदी सक्ती करू इच्छित असल्याचं दिसते.
याचदरम्यान, जयंत पाटलांनी प्रसिध्द केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP SP) पत्रकात महाराष्ट्राच्या जनभावनेचा कुठेच विचार घेतला नसल्याचं जाणवतं, कुणालाही विविध भाषा शिकण्याचा हक्क नाकारणे योग्य नाही, पण शालेय पातळीवरून प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून झाले पाहिजे असे घोषित आहे, यावर पक्षाचा कायमच ठाम विश्वास आहे. तरीदेखील,हे सरकार जाणीवपूर्वक मराठी भाषेला दुय्यम दर्जा देत आहे हे अत्यंत दुर्दैवी असून,एकतर्फी निर्णय राबविणे हे तितकेच धोकादायक असल्याची टीकाही करण्यात आली आहे.
त्यामुळे या हिंदी सक्तीचा विरोध करण्यासाठी येत्या शनिवार, दि. 5 जुलै 2025 रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत एक मोठा मोर्चा पुकारण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा आहे.
म्हणूनच,मी पक्षातील सर्व लोकप्रतिनिधींना,पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आवाहन करतो आहे की, येत्या 5 जुलैला मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी होण्याविषयीचं आवाहन जयंत पाटील यांच्याकडून करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.