Sharad Pawar On Varsha :
Sharad Pawar On Varsha : Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar On Varsha : शरद पवार अनेक वर्षांनी 'वर्षा'वर ; आठवणींना उजाळा !

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवास्थानी भेट घेतली. या भेटीमागे काही राजकीय अर्थ दडले आहेत, असे बोलले जात होते. परंतु ही फक्त एक सदिच्छा भेट होती. मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट होती, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान शरद पवार हे अनेक वर्षांनंतर मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या 'वर्षा' या शासकीय बंगल्यावर दाखल झाले. यामुळे त्यांच्या वर्षाभेटीमुळे या गोष्टीकडे लक्ष वेधले जात आहे. चार वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या शरद पवार यांचा वर्षा या निवासस्थानाशी जवळचं नातं आहे. आजच्या भेटीमुळे आज या आठवणी पुन्हा एकदा जागल्या गेल्या. शरद पवार हे पहिल्यांदा १९६७ साली महाराष्ट्राच्या विधानसभेत दाखल झाले. १९६७ सालच्या विधानसभा निवडणुकीत पवार हे बारामती मतदारसंघातून विजयी झाले.

वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात पवारांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. यानंतर १९७२ आणि १९७८ सालच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. दरम्यान १८ जुलै १९७८ रोजी शरद पवार हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यावेळी खऱ्या अर्थाने पवारांचा वर्षा या निवासस्थानाशी संबंध आला. ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते.

१९८४ सालची लोकसभा निवडणूक शरद पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. मात्र त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले. यामुळे त्यांनी १९८५ ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. २६ जून १९८८ रोजी पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी १९९० मध्ये निवडणुका होणार होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसनेचं याच काळात प्रस्थ वाढत होतं. यावेळी राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २८८ पैकी १४१ तर शिवसेना-भाजप युतीने ९४ जागा जिंकल्या. राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावले. तरीही १२ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी ४ मार्च १९९० रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली.

पवारांची मुख्यमंत्रिपदाची चौथी कारकीर्द काही अंशी वादळी ठरली. ते मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले. त्यांत काही लोक ठार तर अनेक लोक जखमी झाले. मात्र यावेळी त्यांनी मुरब्बी राजकारण्यासारखी परिस्थिती हाताळली.

शरद पवार यांनी चार वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. या दरम्यान त्यांचे वर्षा या निवासस्थानाशी फार जवळून संबंध होता. पवारांनी आपल्या कारकीर्दीत वर्षा निवास्थानावरूनच महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. महाराष्ट्राचा सत्तेचा गाडा हाकला. आज शरद पवार हे अनेक वर्षांनंतर वर्षा या निवास्थानावर दाखल झाल्याने, त्यांचा आणि वर्षा निवासस्थानाच्या जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT