Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

पवारांनी भाजपबाबत ३० वर्षांपूर्वी मांडलेला विचार आमच्या लक्षात दोन वर्षांपूर्वी आला!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजपला देशाचे ऐक्य नको आहे, हे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९२ मध्ये सांगितले होते. पण, आम्हाला दोन वर्षांपूर्वी ते थोडं लक्षात आले. त्यांची दूरदृष्टी बघा की ते तेव्हापासून आम्हाला सांगत आहेत, की भाजप देशाचे तुकडे पाडत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेतोय, हे पवारांनी १९९६ च्या आसपासही सांगितले होते. भाजप देशाला किती उलट्या दिशेने नेतो आहे, हे आम्हाला आता कळायला लागलं आहे, अशा शब्दांत तीन पक्षाच्या एकत्र येण्याचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा समर्थन केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भाषणांचा संग्रह असलेल्या ‘नेमकची बोलणे’ हा ग्रंथ राष्ट्रवादी मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांनी लिहिला आहे. त्याचे प्रकाशन शनिवारी (ता. ११ डिसेंबर) मुंबईत खासदार संजय राऊत, ज्येष्ठ साहित्यीक रंगनाथ पठारे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यावेळी राऊत बोलत होते.

राऊत म्हणाले की, प्रश्न विचारणाऱ्यांची काय अवस्था आहे, हे आपण सध्या पाहतो. पण पवारांचे उलटे आहे, त्यांना प्रश्न विचारलेले आवडतात. त्यांना उत्तर शोधायला आवडतात. आम्ही पत्रकार व नेतेमंडळी पूर्वी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दररोज भेटायचो, पण आता तसं होत नाही. या देशातील लोकांचा संवाद होऊ नये. विचाराचे आदानप्रदान होता कामा नये, म्हणून सेंट्रल हॉलमध्ये पत्रकारांना निर्बंध आणले गेले. तेव्हापासून तिकडचा संवाद पूर्णपणे तुटला. त्याच्यावरसुद्धा पवारांनी १९९० मध्ये मत व्यक्त केले आहे. विचार मांडायचाच नाही, ही प्रवृत्ती झुंडशाही वाढवणारी आहे. या सर्व झुंडशाहीचा आज आपण सर्वजण सामना करत आहोत.

शरद पवारांची भाषणे वाचत असताना मला त्यामध्ये (स्व.) यशवंतराव चव्हाण यांचे प्रतिबिंब दिसले. ही भाषणे वाचताना यशवंतराव कुठेतरी आपल्याशी संवाद साधत आहेत, असे मला वाटल होते. यशवंतराव चव्हाणांनी भावी महाराष्ट्राचे जे चित्र रंगवले होते, त्या चित्रानुसार या राज्याला दिशा देण्याचे काम पवारांच्या नेतृत्वाने केले आहे. त्यांच्याशी ज्या ज्या वेळी संवाद साधला, त्यावेळी त्यांच्या मनात महाराष्ट्र, देशाबद्दल सद्‌भावना दिसून आली आहे, अशा शब्दांत राऊतांनी पवारांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

महाराष्ट्रात शिवसेना-युती सरकार असताना ‘हे पंतांचे सरकार आहे’, असे पवार म्हणाले होते. पण, मी सांगतो की तेसुद्धा ठाकरेंचेच सरकार होते. तेव्हा त्यांनी मुंबईतील मराठी माणसांना ‘जमिनी व्यापाऱ्यांना विकू नका,’ असे ठणकावून सांगितले होते. तोच विचार पवारांनी बीडीडी चाळीच्या पुनर्निमाण होत असताना चाळकऱ्यांना नवे घरे देण्याची प्रक्रिया सुरू असताना ही घरे विकून तुम्ही मुंबईबाहेर जाऊ नका, असे आवाहन केले होते. मुंबईवरील मराठी माणसाचे वर्चस्व कमी होऊ नये, यासाठी त्यांनी काम केले आहे, असेही राऊतांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT