Sada Sarvankar - Uddhav Thackeray - Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

Sada Sarvankar News : शिंदे गटाच्या सदा सरवणकरांचा ठाकरे, राऊतांवर गंभीर आरोप; '' आम्हांला पेट्रोल टाकून मनोहर जोशींचं...''

Deepak Kulkarni

Mumbai : शिवसेनेतील बंडखोरी,भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याला आता वर्षभराहून अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, दिवसेंदिवस ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांची चिखलफेक केली जात आहे. तसेच खळबळजनक दावे - प्रतिदावे देखील केले जात आहे. याचदरम्यान, आता शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचे आमदार व नेते सदा सरवणकर(Sada Sarvankar) यांनी एका कार्यक्रमात खळबळजनक दावा करतानाच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊतांविषयी धक्कादायक विधान केलं आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर संजय राऊतांनी आम्हाला पेट्रोल टाकून मनोहर जोशींचं घर जाळण्यास सांगितल्याचा दावा केला आहे.

सदा सरवणकर नेमकं काय म्हणाले ?

शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर म्हणाले, आमच्या आयुष्यातील गुरु मनोहर जोशी होते. ज्यावेळी मला उमेदवारी नाकारली तेव्हा मी मनोहर जोशींना काय करु, असं विचारलं. जोशी म्हणाले, सदा तुला तुझी ताकद दाखवावी लागेल. ‘मातोश्री’वर शिवसैनिकांना घेऊन जा. मग मी ‘मातोश्री’वर गेलो. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) बसलेले होते. ते म्हणाले, मला वाटतंय तूच निवडून येऊ शकतो. तूच आमचा उमेदवार. पण करणार काय? तुला उमेदवारी नाही देऊ शकत अन् कारणही नाही सांगू शकत असं म्हटलं.

'' पेट्रोल घेऊन जा, जाळून टाक त्यांचं घर..''

यानंतर उध्दव ठाकरे तिथून निघून गेले. मिलिंद नार्वेकर तिथे होते. त्यांना एक फोन आला. फोनवर बोलणं झाल्यानंतर नार्वेकर म्हणाले, तुमचं तिकिट मनोहर जोशींनी(Manohar Joshi) कापलेलं आहे. त्यामुळे हे शिवसैनिक जोशींच्या घरी घेऊन जा. मग मी जोशी सरांच्या घराकडे निघालो. थोडं पुढे गेलो तेव्हा संजय राऊतांचा फोन आला. मला म्हणाले कुठे चालले? त्यांना कशाला सांगायचं..त्यामुळे मी उडवाउडवीची उत्तरं दिली. सेना भवनाला चाललो वगैरे. ते म्हणाले, तू मनोहर जोशींच्या घरी चालला आहेस ना, मोर्चा घेऊन. मग तू असाच जाऊ नकोस. पेट्रोल घेऊन जा, जाळून टाक त्यांचं घर.. काही शिल्लक ठेवू नकोस.

''...तोपर्यंत एवढी तयारी कशी झाली? ''

मातोश्री’चा आदेश हा अंतिम असतो. त्यामुळे मी मनोहर जोशींच्या घरी निघालो. तेराव्या माळ्यावर शिवसैनिक चालत गेले. मात्र तिथे पंधरा ते वीस शिवसैनिक होते, जे कधीच नसतात. घराच्या आजूबाजूला काही व्हिडिओ कॅमेरे घेऊन लोक उभे होते. चॅनेलचेही लोक होते. मला प्रश्न पडला मला याठिकाणी येण्यासाठी एक तास लागला तोपर्यंत एवढी तयारी कशी झाली? तरीही आम्ही आदेश पाळायचा म्हणून पुढे गेलो आणि त्यानंतर जी घटना घडली ती सर्वांनाच माहिती आहे.

मिलिंद नार्वेकरांनी त्यानंतर दुपारी फोन करुन चांगलं काम केल्याचे सांगत उमेदवारी निश्चित असल्याचं सांगितलं. तसेच दुसऱ्या दिवशी अकरा वाजता मातोश्रीवर या असा निरोप दिला. त्यानुसार, दुसऱ्या दिवशी मातोश्रीवर पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत समोर होते. यावेळी त्यांनी माझ्यासमोर पेपर फेकत त्यात काय आलंय बघ म्हणून सांगितलं. त्यावेळी पेपरात आमदार सदा सरवणकरांनी मनोहर जोशींच्या घरावर हल्ला केल्याचा बातम्या होत्या.

'' ठाकरेंनी जाळ्यात अडकवून उमेदवारी नाकारायचे...''

मला जोशींचं घर जाळण्याचा आदेश देण्यात आला होता असं मी त्यांना सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, एवढं सगळं करुन तू निवडून कसा येणार? तुम्ही सांगितल्यानं मी हे सर्व केलं आहे. मी निवडून येऊन दाखवेन. त्यांनी निवडून येत नसल्याचं सांगत पेपर बाजूला केला आणि निघून गेले. जाळ्यात अडकवून उमेदवारी नाकारायचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. हे काम बाळासाहेब ठाकरे यांनी कधी केलं नाही. असं हे कद्रू नेतृत्व असल्याने शिंदे यांनी उचललेले पाऊल शंभर टक्के बरोबर आहे असंही ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT