Narendra Modi Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

BJP Vs Shivsena : उद्धव ठाकरेंवरील रागापोटी मोदी सरकार राज्याला पैसे देत नाही, शिवसेना नेत्याचा आरोप

Jagdish Patil

Bhaskar Jadhav On Modi Govt : विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती असो वा महाविकास आघाडी दोन्ही बाजूला निवडणुकीला सामोरं जाताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? आणि कुणाच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरं जायचं याचा मोठा पेच निर्माण झाला आहे.

युती-आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. शिवाय आपल्याच पक्षाच्या नेत्याच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जाव्यात असं अनेकांना वाटत आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी, 'येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढवल्या जातील, असा दावा केला आहे. तसंच ठाकरेंवरील राग केंद्र सरकार महाराष्ट्रावर काढत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

जाधव (Bhaskar Jadhav) यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील असं सांगतानाच ठाकरेंवरील रागापोटीच केंद्र सरकार महाराष्ट्राला पैसे देत नसल्याचा आरोप केला. भास्कर जाधव म्हणाले, "केंद्र सरकार जे पैसे वाटत आहे. ते स्वतःच्या फंडातून देत नाही. तर ते देशातील नागरिकांच्या टॅक्समधून ते पैसे देत आहे.

बिहार, आंध्रप्रदेशला वेगळं पॅकेज दिलं जात आहे. महाराष्ट्राने तुमचा अहंकार मातीमोल केला, तुमचं गर्वहरण केलं "अब की बार 400 पार, म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) 'अब की बार तडीपार' केल्यामुळे तुम्ही महाराष्ट्राला पैसे देणार नाही का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विधानसभा ठाकरेंच्या नेतृत्वात लढवणार

तसंच, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढवल्या जातील आणि त्यांच्याच नेतृत्वातील सरकार राज्यात आणू, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केल्याचं दिसून येत आहे.

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे. तशीच जनतेची सुद्धा इच्छा असल्याचंही ते म्हणाले. जाधव यांनी महायुती आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा अपमान केला. नीती आयोगाच्या बैठकीत खूप काही मिळणार अशा बातमी पेरल्या, मात्र राज्याच्या वाट्याला काहीही आलं नसल्याचं ते म्हणाले.

गृहमंत्री राज्याला लांच्छनास्पद

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पक्षातील कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी ठोकून काढा असे म्हणतात. अजितदादा पवार फक्त आपल्याच आमदारांना पैसे देतात हा पायंडा पडला आहे. त्यांचं राज्याकडे लक्ष नाही, तर दुसऱ्याचे सरकार आणि आमदार फोडायचे यावर त्यांचे लक्ष आहे. गृहमंत्री ठोकून काढायची भाषा करतात, हे गृहमंत्री राज्याला लांच्छनास्पद आहेत, अशा शब्दात त्यांनी अजितदादा आणि फडणवीसांवर टीकास्र डागलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT