KDMC Politics sarkarnama
मुंबई

Shiv Sena-MNS Alliance : शिवसेना-मनसेची मैत्री तुटणार? भाजपकडून दबाव वाढला, तर अल्टिमेटमच्या भानगडीत न पडण्याचा शिवसैनिकांचा इशारा

KDMC BJP : सत्तेत सहभागी झाल्यानंतरही मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजपच्या नेत्यांवर टीका केली जात असल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. तसेच शिंदेंच्या शिवसेनेने मनसेसोबतची मैत्री तोडावी म्हणून दबाव वाढवल्याची चर्चा आहे.

सरकारनामा ब्यूरो

BJP Shiv Sena MNS Alliance Kalyan Dombivli : पुण्यात मनसे नेते अमित ठाकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविल्याच्या वादाचे पडसाद आता कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकारणात उमटू लागले आहेत. या घटनेवरून भाजपने शिवसेनेला मनसेसोबतची युती तोडण्याची मागणी केली असून, अन्यथा केडीएमसीमधील युतीचा फेरविचार करण्याचा इशाराही दिला आहे.

भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, उपमहापौर राहुल दामले तसेच भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची या घटनेचा निषेध करण्यासाठी बैठक झाली. बैठकीत मनसेच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर नंदू परब यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना खरमरीत पत्र लिहून केडीएमसीमधील मनसेसोबतची युती तातडीने तोडण्याची मागणी केली आहे.

२०२६ च्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून एकत्र लढले, तर मनसेने महायुतीविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला विश्वासात न घेता मनसेला सत्तेत सहभागी करून घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यावेळी केवळ महायुतीचा धर्म पाळण्यासाठी भाजपने या निर्णयाला विरोध केला नसल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

मात्र, सत्तेत सहभागी झाल्यानंतरही मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजपच्या नेत्यांवर टीका केली जात असल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. ३१ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कॉलेजमध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेबाबत केलेल्या कथित कृत्याचाही भाजपने पत्रातून तीव्र निषेध नोंदवला आहे.

मनसेच्या या भूमिकेबाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्तेतून मनसेला तातडीने बाहेर काढावं, अशी मागणी भाजपने केली आहे. अन्यथा भाजपला स्वतंत्र निर्णय घेण्यास पूर्णपणे मोकळे असल्याचा थेट इशाराही नंदकिशोर परब यांनी दिला आहे.

'युती धर्माची आठवण देऊ नका'

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावरून भाजपच्या भूमिकेनंतर आता शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. मनसेबाबतचा अंतिम निर्णय शिवसेनेचे वरिष्ठ नेते घेतील, असे स्पष्ट करतानाच भाजपने शिवसेनेला अल्टिमेटम देण्याच्या भानगडीत पडू नये, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी दिला.

अमित ठाकरे यांचे शिवसेना समर्थन करीत नाही. जे झाले ते चुकीचे झाले, अशी भूमिका कदम यांनी स्पष्ट केली; मात्र युती धर्माची आठवण करून देण्यापूर्वी भाजपने अंबरनाथ, भिवंडी आणि बदलापूरमधील राजकीय घडामोडींचा विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT