Bhavan Gawali Latest News, Rajan Vichare Latest Marathi News
Bhavan Gawali Latest News, Rajan Vichare Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

भावना गवळींची उचलबांगडी अन् विचारेंना बढती का? राऊतांनीच सांगितलं कारण...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) खासदार भावना गवळी यांची लोकसभेतील पक्ष प्रतोद पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्याच बालेकिल्ल्याती खासदार आणि त्यांचे निकटवर्ती विचारेंवर मोठी जबाबदारी टाकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या नियुक्तीबाबत खासदार संजय राऊत यांनीच खुलासा केला आहे. (Sanjay Raut Latest Marathi News)

मुंबईत गुरूवारी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, राजन विचारे (Rajan Vichare) हे ठाण्याचे खासदार आहेत. ठाण्याचे आमदार, महापौर होते. नगरसेवकही होते. आनंद दिघे यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलेले ते नेते आहेत. ते लोकसभेत उपमुख्य प्रतोद होते. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विचारे यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुढील काही काळात अनेक निर्णय होतील. कामाला गती मिळायला हवी. भावना गवळी (Bhavana Gawali) उत्तम काम करत होत्या. पण त्यांच्या काही कायदेशीर लढाईमध्ये गुंतलेल्या आहेत. त्यांना संसदेत उपस्थित राहता येत नव्हतं. त्या खूप कमी येतात. अशावेळी संसदेत प्रतोद उपस्थित असायला हवेत. त्यांची गरज असते. हा सगळ्यांशी बोलून निर्णय घेतला आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

अडसूळांवर होता दबाव

आनंदराव अडसूळ यांच्या राजीनाम्याबाबत माध्यमांमधून समजले. यांच्यावरही गेल्या काही महिन्यांपासून ईडीची कारवाई सुरू होती. घरांवरही ईडीच्या धाडी पडल्या होत्या. त्यांच्यावर कठोर कारवाईची ईडीची तयारी होती. त्यांना अटक होईल, असं भाजपचे काही नेते बोलत होते. ईडीचा दबाव शिवसेनेतील अनेक नेत्यांवर आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

भूमरेंनी राऊतांसमोर लोटांगण घातलं होतं!

बंडखोर आमदारांकडून राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्याला राऊतांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं. आमदार भूमरे यांच्याविषयी बोलताना राऊत म्हणाले, संदीपान भूमरे मंत्री झाले तेव्हा सामना कार्यालयात येऊन त्यांनी माझ्यासमोर प्रेमानं लोटांगण घातलं होतं. साहेब, तुम्ही होतात म्हणून सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो, असं त्यावेळी भूमरे म्हणाल्याचा दावा राऊतांनी केला आहे.

भूमरे यांनी लोटांगण घातल्याचे व्हिडीओ फुटेज असेल तर काढायला लावतो. आज तेच भूमरे उद्धव ठाकरेंवर आगपाखड करतात, असं राऊत म्हणाले. संजय राठोडांवरच्या संकटामध्ये उद्धव ठाकरे त्यांच्यामागे कसे ठामपणे उभे राहिले, हे सगळ्यांना माहिती आहे. आमचं मन स्वच्छ आहे. कुणालाही काही बोलू देत, असंही राऊत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT