Shiv Sena vs BJP Maharashtra : महाराष्ट्रातील भाजप महायुती सरकारमधील भ्रष्टाचार मंत्र्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कारवाई होत नसल्याने, त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.
'महाराष्ट्रात नवीन फडणवीस अॅक्ट आला आहे, समज द्या अन् सोडून द्या, असे या कायद्याचं स्वरुप आहे. त्याअगोदर वॉशिंग मशीन होतं. आता फडणवीस अॅक्ट, समज द्यायची अन् माफी द्यायची', असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) आणि भाजप महायुती सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "महाराष्ट्रात नवीन कायदा आला आहे, 'फडणवीस अॅक्ट', समज द्या अन् सोडून द्या, जसं काही मंत्र्यांना समज दिली अन् सोडून दिलं. हाच तो महाराष्ट्रात आलेला नवीन अॅक्ट, 'फडणवीस अॅक्ट', बाकी सर्वांवर कायदेशीर कारवाई होईल". इतरांवर जनसुरक्षा कायद्यानुसार अन् भ्रष्टाचार विरोधी कायद्यानुसार कारवाई होईल".
'मंत्रिमंडळातील अपराधी आहेत. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate), संजय शिरसाट, संजय राठोड अन् कोणी असेल, यांची जागा बाहेर असायला हवी, तुरुंगात असायला हवी, ते मंत्रिमंडळात आहे. महाराष्ट्रात जो 'फडणवीस अॅक्ट' लागू आहे, त्यामुळेच होतं आहे सर्व. त्या अगोदर वाॅशिंग मशीन होती, मग 'फडणवीस अॅक्ट' आला, समज द्यायची आणि माफी द्यायची', असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
शिंदेंच्या निगडीत, नातेवाईकांभोवती कारवाईचा फास आवळला जातोय, या प्रश्नावर संजय राऊत यांनी, 'यावर आता भाष्य करणं योग्य नाही. परंतु हे सर्व दबावाचं राजकारण आहे. झारखंड मद्य घोटाळ्यातील अमित साळुंके असेल, काल वसई-विरार महापालिकांच्या आयुक्तांवर पडलेला छापा असेल, हे सर्व पाहता एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कोणीतरी इशारा देत आहे, याद राखा, काही हालचाल केलात तर, सर्व फाईली टेबलावर आहेत. परंतु या फाईली पोलिसांकडे केव्हा जाणार हे पाहावं लागेल'.
विधिमंडळाच्या चौकशीच्या अहवालात मंत्री माणिकराव कोकाटे 18 ते 20 मिनिटं मोबाईलवर रमी खेळत होते, असा अहवाल आहे. 'अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात? किंवा विधानसभा अध्यक्ष किती किंमत देतात? अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएकडे धुळ्यामध्ये सरकारी विश्रामगृहावर 1 कोटी 80 लाख रुपये सापडले, त्यापूर्वी एका ठेकेदाराने 10 कोटी गोळा करून जालना इथं पाठवले. ते कोणासाठी पाठवले? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
'चौकशीसाठी एटीएस नेमलं, पुढं काय झालं? देवेंद्र फडणवीस कारवाईच्या घोषणा करतात, एटीएसची स्थापन करतात. अंदाज समितीचा अध्यक्ष लाचखोर आहे. हे उघड झालं आहे. त्याला वाचवलं जात आहे. विधानसभा अध्यक्ष देखील त्याला वाचवत आहे. म्हणून हा नवीन 'फडणवीस अॅक्ट' आला आहे. आपल्या लोकांना वाचवायचं, समज द्यायची सोडून द्यायचं. इतरांना तुरुंगात टाकायचं', असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
'सरकार निर्लज्ज असेल, भ्रष्टाचारा पाठिंबा देत आहे,विरोधी पक्ष राज्यपालांना जाऊन भेटला. या सर्व मंत्र्यांच्या भ्रष्टाचारांच्या फाईली घेऊन आम्ही लवकर राष्ट्रपतींना भेटणार आहोत. राज्यपाल कारवाई करत नसतील, मुख्यमंत्री भ्रष्टाचाऱ्यांना पाठिंबा देणारे असतील, तर आमच्याकडे हाच पर्याय आहे की, राष्ट्रपतींना भेटायचं', असे संजय राऊत यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.