Uddhav Thackeray - Shambhuraj Desai
Uddhav Thackeray - Shambhuraj Desai Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : ..तर ठाकरेंवर ही वेळ आली नसती, दानवेंच्या निलंबनाच्या कारवाईवर शंभूराज देसाई असे का म्हणाले?

Jagdish Patil

Mumbai News : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली असेल तर दानवे यांचे वक्तव्य चुकीचं असल्याचा सिद्ध होतं. शिवाय दानवे यांनी कालच सभागृहात माफी मागितली असती तर ठाकरेंवर अशी वेळच आली नसती, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांचे पाच दिवसाचे निलंबन करण्यात आले आहे. याच प्रकरणावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली. शिवाय निलंबनाची कारवाई एकतर्फी झाल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.विधान परिषदेच्या सभागृहात काल भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्त्यव्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर दानवेंनी राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याची विधानपरिषदेत चर्चा नको अशी भूमिका घेतली होती.

सभागृहात दानवे बोलत असताना आमदार प्रसाद लाड यांनी दानवे यांच्याकडे हातवारे करत तीव्र विरोध दर्शविला. त्यावेळी दानवे यांनी माझ्याकडे हात करायचा नाही, असे म्हणत प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज स्थगित केले होते.

मंगळवारी विधानपरिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्याची मागणी भाजपच्या आमदारांकडून केली जात होती. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दानवे यांना पाच दिवस निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी हा प्रस्ताव वाचून दाखवित यावर मतदान घेत पाच दिवसांसाठी दानवे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव आवाजी मतदानाद्वारे मान्य झाल्याचे जाहीर केले.

या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी दिलगीरी व्यक्त करत दानवे यांच्याविरोधात षढयंत्र असल्याचे सांगितले. या सर्व प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पदाधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे नेत्यांवर माफी मागायची वेळ येऊ नये, असं म्हणत देसाई यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

माध्यमांशी बोलताना देसाई म्हणाले, 'अंबादास दानवे यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली असेल तर दानवे यांचे वक्तव्य चुकीचं असल्याचं सिद्ध होतं. दानवे यांनी कालच सभागृहात माफी मागितली असती तर उद्धव ठाकरेंवर अशी वेळ आली नसती. अशा पदाधिकाऱ्यामुळे नेत्यांवर माफी मागायची वेळ येत असेल तर हे वर्तन चुकीचं आहे'.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT