Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : कर्नाटक सरकारनंतर ठाकरेही गरजले; सत्ता आल्यानंतर ‘तो’ कायदा बदलणार...   

Rajanand More

Mumbai : मागील काही दिवसांपासून राज्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या कराच्या पैशातील वाट्यावरून वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकशी दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील सर्व मंत्री, काँग्रेसचे आमदार, खासदारांनी दिल्लीत आंदोलन केले. त्याचाच संदर्भ देत शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) प्रमुख उध्दव ठाकरेंनीही मोदी सरकारविरोधात दंड थोपटले. (Uddhav Thackeray News)

मुंबईतील स्थानीय लोकाधिकारी समितीच्या अधिवेशनात ठाकरेंनी मोदी सरकारसह (Modi Government) भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडले. जीएसटीतून केंद्र सरकारला जाणाऱ्या कराच्या पैशाबाबत ते म्हणाले, मोदी गॅरंटीमध्ये बराचसा पैसा महाराष्ट्राच्या कष्टाचा आहे. महाराष्ट्राला फक्त सात पैसे मिळतात. जो एक रुपया आम्ही राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकारला देतो, त्यातील 50 टक्के वाटा महाराष्ट्राला मिळायलाच हवा. महाराष्ट्राला पूर्णपणे लुळंपांगळं कराण्याचा प्रयत्न होत आहे आता आम्हाला हक्काचा पैसा मिळाला पाहिजे. सत्ता आल्यानंतर त्याबाबतचा कायदा बदलण्यासाठी माझा आग्रह राहील.

राजकारणासाठी भारतरत्न...

भारतरत्न ज्यांना जाहीर झाला, त्यांचे कर्तृत्व मोठे आहेच. भारतरत्न किती द्यायची, कुणाला द्यायची याचं एक सुत्रं आहे. पण आले मोदींच्या (PM Narendra Modi) मना...असे सुरू आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सध्या भारतरत्न दिली जात असल्याची टीका ठाकरेंनी केली. कर्पूरी ठाकूर यांना मतांसाठी भारतरत्न पुरस्कार दिला. एम. एस. स्वामीनाथन यांनाही त्यासाठीच दिला. त्यांनी दिलेल्या अहवालाचीही अंमलबजावणी करा, अशी आमची मागणी आहे. काही दिवसांत आणखी भारतरत्न जाहीर करतील, असे ठाकरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नेहरूंपेक्षा जास्त काळ सत्ता भाजपने भोगली

पंडित जवाहरलाल नेहरू जाऊन आज 60 वर्षे झाली. ते 16 वर्षे पंतप्रधान होते. त्यानंतरच्या काळात जनता पक्ष, व्ही. पी. सिंहांनाही भाजपचा पाठिंबा होता. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांची सहा वर्षे आणि आता मोदींची दहा वर्षे. नेहरूंपेक्षा जास्त काळ भाजपने भोगली. मागील दहा वर्षांत तुम्ही काय केले तेही सांगा. नोटबंदी, शेतीविषयीचे काळे कायदे, पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहेत, हेही सांगा. नेहरूंनी 60 वर्षांपुर्वी काय केले हे सांगून सगळे त्यांच्या अंगावर टाकायचे. तरीही काही राहिले तर देशद्रोही ठरवून पाकिस्तानात जायला सांगायचे. ही कसली लोकशाही, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

आपण कधी सुडाचे राजकारण केले नाही. सत्ता आल्यानंतर काँग्रेस, शिवसेना किंवा राष्ट्रवादी पक्ष संपवण्याचा प्रयत्न कधी केला नाही. मी जिंकल्यानंतर त्याला संपवून टाकेल, ही पाशवी वृत्तीला चिरडून टाकावे लागेल. विरोधकांना, मित्रपक्षांना, पक्षातील नेत्यांना तुम्ही संपवत आहात. हे नितीन गडकरीही बोलतात. दिल्लीत गडकरी गेल्यानंतर देशाला मोठा फायदा होईल, असे वाटले होते. पण तेही हतबल झाल्याचे ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT