UNESCO heritage forts : केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे.
12 गडांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांनी ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचं म्हटलं आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी देखील मराठी जनतेचं अभिनंदन केलं आहे.
तसंच यावेळी त्यांनी राज्य सरकारला केवळ आनंद साजरा न करता कर्त्याव्याची जाणीव करून दिली आहे. युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं, याची आठवण त्यांनी करून दिली आहे. राज ठाकरेंनी आपल्या एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.
ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब असल्याचं म्हटलं आहे. तसंच या 12 किल्ल्यांपैकी एक किल्ला जिंजीचा किल्ला तामिळनाडू मधला आहे.
या निमित्ताने महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठवर पोहचला होता हे महाराष्ट्राचं कर्तृत्व यावर बोलणाऱ्यांना हे कळेल आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतींचा सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे हे पण कळेल, असंही त्यांनी लिहिलं आहे. शिवाय या निमित्ताने महाराजांच्या या महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
एकदा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला की त्या वास्तूचं संवर्धन, नूतनीकरण याचे खूप कडक निकष असतात ते पाळावे लागतील, पण त्यामुळे किमान महाराजांचे किल्ले तरी नीट राखले जातील. आता राज्य सरकारला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल आणि राज्याने देखील उत्तम निधी उपलब्ध करून द्यावा.
आत्तापर्यंतच्या एकूण एक सरकारांनी गडकिल्ल्यांची जी दुरवस्था करून ठेवली होती त्यामुळे जगाला बोलावून हे किल्ले दाखवावे, आपल्या महाराजांचं, महाराष्ट्राचं वैभव दाखवावं अशी परिस्थिती नव्हती ती आता बदलेल अशी आशा व्यक्त करत त्यांनी सरकारला टोला देखील लगावला आहे.
मी आम्ही हे गेली अनेक वर्षे म्हणत आलो आहे की महाराजांनी उभारलेले किल्ले आणि महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी याचं नीट जतन केलं आणि तिथे पर्यटनासाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठच्या कुठे निघून जाईल असं सांगत त्यांनी राज्यातील समुद्र किनारपट्टीकडे देखील राज्य शासनाने लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी सरकारला एक आठवण करून दिली आहे. ती म्हणजे म्हणजे युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
शिवाय याबाबतची त्यांनी दोन दिली आहेत. त्यांनी लिहिलं, आतापर्यंतची दोनच उदाहरणं आहेत पण ती आहेत हे विसरू नका. एक उदाहरण आहे ओमान मधल्या अरेबियन आवरिक्स अभयारण्याचं आणि दुसरं उदाहरण आहे ड्रेस्डन व्हॅलीचं. जर्मनीतील ड्रेस्डन व्हॅलीला जागतिक वारसा दर्जा मिळाला पण निकष न पाळल्याने तो 2009 ला काढून घेतला.
यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं. तसेच सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका ! त्यात जात धर्म पहाण्याची गरज नाही, पुन्हा एकदा मराठी जनतेचं अभिनंदन, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.