Eknath Shinde , Akbaruddin Owaisi Latest News
Eknath Shinde , Akbaruddin Owaisi Latest News Sarkarnama
मुंबई

एकनाथ शिंदेनी घेतला ओवेसींचा समाचार; म्हणाले...

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : औरंगजेब (Aurangzeb) हा स्वराज्याचा शत्रू होता, त्याने हिंदूंच्या देवस्थानाची, मंदिरांची नासधूस केली. खरं म्हणजे अशा देशद्रोही ज्यांनी स्वराज्याचा द्रोह केला,अशा औरंगजेबाच्या कबरीला ओवेसी नेते भेट देतात. ओवेसींनी (Akbaruddin Owaisi) जे केले त्याचा मी निषेध करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी डोंबिवलीत व्यक्त केली. (Eknath Shinde , Akbaruddin Owaisi Latest News)

ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्रगती कला व वाणिज्य महाविद्यालय डोंबिवली यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ठाणे जिल्ह्यातील किर्तनकार सन्मान सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (ता.13 मे) करण्यात आले होते. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे आयोजित या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, गणपत गायकवाड, रविंद्र चव्हाण, ह.भ.प. उद्धव मंडलिक, जगन्नाथ पाटील, दत्तात्रय वझे, संतोष केणे, अशोक महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

एमआयएम नेते ओवेसी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावर पालकमंत्री शिंदेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कार्यक्रमा दरम्यान खासदार शिंदेनी कल्याण शीळ रोडला संत सावळाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. यावर पालकमंत्र्यांनी पूर्ण प्रक्रियेनुसार ही मागणी तातडीने पूर्ण करण्याचे यावेळी आश्वासन दिले.

शिंदे म्हणाले, ठाणे जिल्ह्यात उत्तम किर्तनकार आहेत. किर्तनकार होणं सोपं नाही. किर्तनकार समाज प्रबोधन करीत समजाला दिशा देण्याचे काम करतात. अन्यायाविरोधात किर्तनाच्या माध्यमातून वार करण्याचं काम वारकरी करत असतात. ठाण्यात वारकरी भवन उभारण्यात आलं आहे. खासदार श्रीकांत यांच्या मागणीनुसार दिवा बेतवडा येथे आगरी कोळी वारकरी भवनसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवलीतील वारकऱ्यांची संत सावळाराम वारकरी भवन उभारण्याची मागणी आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून घ्या. मी निधी देईन, असे आश्वासनही त्यांनी दिले.

तसेच दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला 'धर्मवीर' हा सिनेमा सर्वांनी बघावा, असे आवाहनही वारकऱ्यांना त्यांनी केले. शिवाय ठाणे जिल्ह्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाई बाबत एमआयडीसी आणि जलसंपदाच्या मंत्र्यान सोबत बैठक लवकरच घेतली जाईल आणि त्यामधून पाणी प्रश्न सोडवला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, कार्यक्रमात कल्याण शीळ रोडला संत सावळाराम महाराज यांचे नाव देण्याची घोषणा पालकमंत्री शिंदे यांनी केली. यावर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे सेनेला टोला हाणत कोणी कितीही काही म्हटले तरी वारकऱ्यांसाठी महामार्ग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नितीन गडकरी यांनी बांधला आहे असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT