Sanjay Raut, Sanjay Nirupam Sarkarnama
मुंबई

Shivsena : 'EVM'वरून दोन्ही शिवसेनेचे 'संजय' आमने-सामने; राऊतांचा दावा अन् निरूपमांचा पलटवार

Jagdish Patil

Mumbai News, 17 June : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालावरुन आता ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आले आहेत. रवींद्र वायकर यांच्या विजयावर संशय व्यक्त करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. शिवाय उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीतील घोटाळा हा निवडणूक घोटाळ्यातील एक आदर्श घोटाळा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राऊतांच्या याच वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत स्वतःच मोठा घोटाळा असून त्यांना सगळीकडे घोटाळा दिसतो. फक्त 48 मतांनी वायकर जिंकले आणि अमोल कीर्तीकर पराभूत झाले हे सत्य स्वीकारले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर निशाणा साधला. (Mumbai North West Lok Sabha Constituency)

तसेच विरोधकांकडून ईव्हीएम हॅक केल्याच्या आरोपांवर बोलताना निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले, "उत्तर पश्चिम मतदारसंघाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वायकरांच्या नातेवाईकाने मोबाईलचा वापर करुन ईव्हीएम अनलॉक केले, ओटीपी जनरेट केल्यामुळे किर्तीकरांचा पराभव झाला, ही अत्यंत चुकीची माहिती आहे. मोबाईलद्वारे EVM हॅक करता येत नाही, कोणताही OTP जनरेट करता येत नाही. विरोधकांकडून खोटं नेरेटीव्ह सेट केलं जात आहे."

राहुल गांधींनी माफी मागावी

ईव्हीएमबाबात खोटं नेरेटीव्ह सेट केल्याबद्दल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी माफी मागावी अशी मागणीही निरुपम यांनी केली. ते म्हणाले, "याबाबत ज्या पेपरने बातमी छापली होती त्यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे आता देशभरातील ज्या ज्या नेत्यांनी या संदर्भात ट्विट केलं होतं त्यांनी माफी मागावी. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, प्रशांत भूषण, आदित्य ठाकरे यांच्यासह ज्यांनी ज्यांनी या खोट्या बातमीचा वापर करून राजकारण केलं त्या सर्वांनी माफी मागावी. राहुल गांधी यांनी देखील या फेक नेरेटीव्ह बाबत माफी मागावी."

ईव्हीएम हॅक केल्याचा विषय हा साधा आणि राजकीय नाही तर तो संवेदनशील मुद्दा आहे. भारताची लोकतांत्रिक परंपरा मोठी आहे. पण एका खोट्या बातमीमुळे निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करून परिस्थिती वादग्रस्त करण्यात आली. सामनामध्ये याबाबतची बातमी मोठ्या मथळ्याखाली छापण्यात आली आहे. याबाबत त्यांनी माफी मागावी, अन्यथा आम्हाला तक्रार करावी लागेल, असा इशारा त्यांनी ठाकरे गटाला दिला.

मातोश्री 2 खोटेपणाची फॅक्टरी

मातोश्री 2 मध्ये बरेच घोटाळे आहेत. तिथं खोटेपणाची फॅक्टरी आहे, ज्याचे मालक उद्धव ठाकरे आणि कारकून संजय राऊत आहेत. खोटं बोलून अनेकदा वाईट प्रचार केला जात आहे, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर घणाघात केला. तसेच वनराई पोलिस स्टेशनमध्ये कोणतीही केस नाही. मतमोजणी केंद्रावर कोणी मोबाईल घेऊन ऑपरेट करत होते याबाबतची केस आहे. त्याचा अर्थ OTP आणि हॅकिंग होत नाही. निवडणूक आयोगाने स्वत: मोबाईलबाबत केस दाखल केली आहे.

मात्र, या केसवरुन वायकर आणि निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. या सर्वांमध्ये थोडी लाज असेल तर माफी मागावी. संजय राऊत स्वतः मोठा घोटाळा आहे. त्यांना सगळीकडे घोटाळा दिसतो. तर केवळ 48 मतांनी वायकर जिकंले आणि किर्तीकर पराभूत झाले हे सत्य स्वीकारले पाहिजे, असं निरुपम म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT