BMC Clerk Recruitment  Sarkarnama
मुंबई

BMC Clerk Recruitment : आदित्य ठाकरेंच्या आंदोलनाला मोठं यश; 'बीएमसी' एक पाऊल मागे, लिपिक भरतीसाठीची 'ती' अट अखेर रद्द

Pradeep Pendhare

Mumbai News : मुंबई महापालिकेत लिपिक पदासाठी निघालेल्या भरतीत प्रशासनानं जाचक अटी लादल्या होत्या. त्याविरोधात राजकीय, कामगार आणि विद्यार्थी संघटनांनी संताप व्यक्त केला होता.

युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून जाचक अटी रद्द करण्याची मागणी करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. आता या जाचक शैक्षणिक अटी रद्द करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनानं घेतला आहे.

मुंबई महापालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे. कार्यकारी सहायक (लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 जागा सरळसेवेने भरली जाणार असून, या पदासाठी मुंबई महापालिकेनं जाचक शैक्षणिक अटी लादल्या होत्या. या जाचक अटींमुळे अनेक उमेदवार पदभरतीपासून वंचित राहिले असते. त्यामुळे सर्वच स्तरावरून या जाचक अटींना विरोध होवू लागला. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

पदभरतीसाठी उमेदवार दहावी, बारावी आणि पदवी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात किमान 45 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला पाहिजे होता. ही अट विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणीची ठरत होती. महाराष्ट्रात कोणत्याही लिपिक भरतीसाठी, अशी अटक नव्हती. परंतु ती मुंबई महापालिकेने ठेवली. UPSC, MPSC परीक्षेसाठी देखील, अशा अटी नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने घातलेल्या या अटीवरून भडका उडाला. ही अट काढून टाकण्याची मागणी करण्यात आली. तसंच काही विशिष्ट प्रवर्गातील उमेदवारांना टंकलेखन परीक्षा नियुक्तीपासून 2 वर्षांत उत्तीर्ण करण्याची मुभा देण्यात आली होती. ही अट सरसकट सर्वाच उमेदवारांना लागू करण्याची मागणी देखील झाली.

शिवसेनेच्या युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरेंनी यांनी, अशा जाचक अटींवर संताप व्यक्त केला. आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून जाचक अट रद्द करण्याची मागणी केली. आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. कामगार सेनेने देखील मुंबई महापालिका प्रशासनाला पत्र देत जाचक अटी रद्द करण्यासाठी इशारा दिला होता. आता या जाचक अटी रद्द करण्याता निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

फडणवीसांना ठाकरेंनी लगावला होता खोचक टोला

भरती प्रक्रियेतील जाचक अटींची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत, त्या रद्द करण्याचा आयुक्तांना सूचना केल्या होत्या. त्यावर आदित्य ठाकरे यांनी 'क्रेडिट घेण्याचं राजकारण नको, आदेश जारी करा. पण नगरविकास खातं तुमचं ऐकणार आहे का?', असा खोचक प्रश्न केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT