Sharad Pawar on Bawankule Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar on Bawankule : असे वक्तव्य म्हणजे पत्रकारांचा अपमानच ; शरद पवारांनी फटकारलं

अनुराधा धावडे

Mumbai News : महाराष्ट्रात पत्रकार कधीही अपेक्षा करत नाहीत. कोणते पत्रकार चहा जेवणासाठी भुकेलेले नाहीत...अशा प्रकारचे वक्तव्य करणं म्हणजे पत्रकारांना बेइज्जत करण्याचा प्रकार आहे, अशा लोकांना काही महत्त्व देऊ नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

या वेळी त्यांनी उसाच्या घटत्या उत्पादनावर आणि कांद्यावरील ४० टक्क्यांच्या निर्यातीच्या मुद्द्यावरही सविस्तर भाष्य केलं आहे.

शरद पवार म्हणाले, उसाचे उत्पादन घटले आहे, याचा परिणाम पुढच्या वर्षी अधिक दिसेल. उसाचे उत्पादन कमी झाले तर त्याचा कारखान्याच्या उत्पादनावर दिसेल, कारखाने किती दिवस चालवायचे असा प्रश्न निर्माण होईल. पण त्याला दुसरे काही पर्याय नक्कीच असू शकतात. साखरेला किंमत वाढेल, त्यामुळे उत्पादक शेतकऱ्याला दोन पैसे देण्याची वेळ निर्माण होईल. त्यावर बसून मार्ग काढायला हवा. दुसऱ्या वर्षाचा सीझन संकटात जाण्याची चिन्हं दिसत आहेत. याच्यासाठी बसून काहीतरी मार्ग काढता येतो.

यापूर्वी माझ्याकडे विभाग होता, त्यावेळी आम्ही काही निर्णय घेतले.आम्ही कच्च्या साखरेवर प्रक्रिया करण्याची परवानगी देऊन त्यातून कारखान्यांचा हंगाम सुरळीत होऊन त्यात होणारे नुकसान हे टाळलं, असे काही निर्णय घ्यावे लागतील. केंद्र सरकार जर चर्चा करणार असेल तर सरकारशी सहकार्य करायला आमची तयारी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कांदा निर्यातीवर ४० टक्के एक्साइड ड्यूटी लावण्यात आली आहे, महाराष्ट्रातील तयार झालेला कांदा बाहेरच्या देशात निर्यात केला जातो. नाशिक, धुळे, नगर, सातारा या भागातील कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जातो. त्यावर केंद्र सरकारने बंधने घातली. कांदा हे जिरायत शेतकऱ्याचं पीक आहे. त्यामुळे त्यावर बंधने घालणं हे अन्यायकारक आणि चुकीच आहे. त्यामुळे कांद्यावरील एक्साइड ड्यूटी काढावी, यासाठी आमचा आग्रह आहे. यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे, या बैठकीतून काही चांगला निर्णय झाला तर चांगलंच आहे.

तसेच, हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावेळीचा पाऊस अधिक चांगला आहे..चार दिवसांच्या आढाव्यानुसार चांगला बदल आहे. हा बदल टिकला पाहिजे, नाहीतर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होईल, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. तर आमदार रोहित पवार यांच्या रोहित पवार बारामती अॅग्रो कारवाईबाबत विचारले असता, मी काय त्याच्यावर बोलू इच्छित नाह,. असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT