narendra modi amit shah
narendra modi amit shah sarkarnama
मुंबई

Narendra Modi News : मोदी अन् शाह यांच्यानंतर भाजपला मते मिळवून देणारं नेतृत्व कोण?

Akshay Sabale

Mumbai News, 19 May : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी जंग-जंग पछाडले आहेत. त्यांना गृहमंत्री अमित शाह यांची साथ मिळत आहे. भाजपच्या उमेदवाराला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, असा प्रचार गल्लीपासून-दिल्लीपर्यंतचे नेते करत आहेत. एकप्रकारे 2014, 2019 आणि आता 2024 मध्येही नरेंद्र मोदींचे नाव आणि चेहऱ्यावरच भाजप मते मागत आहे. पण, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यानंतर भाजपला मते मिळवून देणारं नेतृत्व कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी विश्लेषण केलं आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ( Indira Gandhi ) यांचं उदाहरण देत मोदी आणि अमित शाह ( Amit Shah ) यांच्या एकाधिकारशाहीमुळे पक्षात दुसरं नेतृत्व निर्माण झाल्याचं दिसत नाही, असं मत सुहास पळशीकर यांनी व्यक्त केलं आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुहास पळशीकर म्हणाले, "इंदिरा गांधींनी सत्तेचं केंद्रीकरण केलं. मात्र, ते पुढील चार ते पाच वर्षेच टिकवता आलं. त्यानंतर सत्तांतर झालं. आता भाजप सरकारमध्ये मोदी आणि अमित शहा यांच्या एकाधिकारशाहीमुळे पक्षात दुसरं नेतृत्व निर्माण झाल्याचं दिसत नाही. त्यांनी पक्षातील एकेक मुख्यमंत्र्यांना बाजूला सारलं. बी. एस. येडियुराप्पा, शिवराजसिंह चौहान, देवेंद्र फडणवीस, मनोहरलाल खट्टर ही त्यांची उदाहरणं आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि शाह यांच्या नंतर भाजपला कोण मते मिळवून देणार, याचं उत्तर आता मिळत नाही."

महाराष्ट्रातील भाजपचे उमेदवार 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवणार नाहीत, असा दावाही पळशीकर यांनी केला आहे. "सातत्यानं भाजपला मोठ्या प्रमाणात मते मिळवणाऱ्या गुजरातमध्ये यंदा काही मतांचा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील वेळी महाराष्ट्रातून भाजपचे अनेक उमेदवार हे 50 टक्क्यांहून अधिक मते घेत निवडून आले होते. पण, यंदा ते शक्य होणार नाही," असं पळशीकर यांनी सांगितलं.

"2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी सारखा उत्साह सध्या दिसत नाही. भाजपनं दावा केल्याप्रमाणं यंदा त्यांच्या जागा वाढणं सध्यातरी कठीण दिसतंय. वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळे निष्कर्ष मतदार काढतील. तामिळनाडू किंवा केरळमध्ये वेगळी कारणं आहेत. तर, गुजरात आणि महाराष्ट्रात वेगळी कारणं आहेत," असंही सुहास पळशीकर यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT