Mumbai News, 31 Jan : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचं बुधवारी (ता.२८) अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
एकीकडे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी मुंबईत दाखल झाल्या आहेत. दुसरीकडे मात्र जेष्ठ नेते शरद पवार यांनी आपणाला सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती नाही, तसंच या संदर्भात बारामतीत पवार कुटुंबियांमध्ये काही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं आहे.
अशातच आता याच सर्व राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष हा मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदा संदर्भात बोलताना राऊत म्हणाले, "अशा बातम्या ऐकायला मिळत आहेत. दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी यांचं नाव ऐकतोय. हा पक्षाचा निर्णय आहे. आम्ही त्यावर काय बोलणार? पण अजून महाराष्ट्रात अजित पवार यांच्या दु:खातून सावरलेला नाही. मात्र, भाजपच्या माध्यमातून कोणी उपमुख्यमंत्री होत असेल तर तो त्यांच्या पक्षाचा आणि कुटुंबाचा विषय आहे.
त्यांच्या पक्षात राष्ट्रीय नेत्यांची फार मोठी फळी आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ या राष्ट्रीय नेत्यांनी हा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी होता. शेवटी हा निर्णय अमित शहा घेणार आहेत. त्यांनी तो घेतला असेल."
तर यावेळी या संदर्भात शरद पवारांना काही माहिती नसल्याचं विचारताच ते म्हणाले, "शरद पवार बरोबर बोलत आहेत. त्यांचा अजित पवार गट आहे. कोणालाच काही माहिती नाही. तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रीय नेत्यांनी मंत्रालयात आणि वर्षांवर येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली आणि त्यांनीच हा निर्णय घेतला."
दरम्यान, जोपर्यंत अजित पवारांचा दुखवटा संपत नाही जोपर्यंत आम्ही या विषयावर बोलणार नाही. भाजप हा मड्याच्या टाळूवरचा लोणी खाणारा पक्ष आहे, एवढंच मी सांगतो. त्यांचा दुखवटा, दुख याच्याशी काही संबंध नाही, पण ही वेळ त्यावर बोलण्याची नाही, असं म्हणत राऊतांनी जास्तीचं बोलणं टाळलं.
तर राष्ट्रवादी पक्षाचा जो काय निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल याच्याशी भाजपचा काही संबंध नाही, या फडणवीसांच्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, भाजपचा संबंध नाही असं कसं होऊ शकतं. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा गट हे भाजपच्या गर्भातून आलेली पिल्लं आहेत. दोन्ही गट शहांनी निर्माण केलेत. राज्यातील प्रमुख घराणी आणि पक्ष भाजपने फोडले. त्यामुळे भाजपचा संबंध नाही बोलणं म्हणजे लोकांना मूर्ख समजणं आहे, असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.