Nana Patole Sarkarnama
मुंबई

Nana Patole : 'मिसेस फडणवीस म्हटल्यात, ते वेश बदलून रात्री-बेरात्री जायचे'; नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं

Pradeep Pendhare

Mumbai News : सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या 41 आमदारांना अपात्रतेच्या याचिकेवर नोटीस बजावली आहे. याकडे लक्ष वेधत, नाना पटोले यांनी, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार असल्याचे म्हटले.

'सत्तेसाठी काहीपण करणाऱ्या भाजपने राज्यात कसे सत्तांतर घडवून आणले, हे मिसेस फडणवीस यांनीच सांगितले आहे. ते वेश बदलून जायचे. रात्री-बेरात्री जायचे', याची आठवण करून देत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं आहे.

"सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाच्या 41 आमदारांना अपात्रतेबाबत नोटीस बजावली आहे. महाराष्ट्रात जे सत्ता परिवर्तन नाट्य झाले, ते शेड्यूल 10 ला ओव्हर रूल करण्याचे पाप भाजपच्या कृपेने झाले. सर्वोच्च न्यायालयाने 3 सप्टेंबरपर्यंत सुनावणी करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रामध्ये 10 शेड्यूला ओव्हर रूल करण्याचे पाप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आता त्याच्या पुढचे चित्र महाराष्ट्रात जरूर पाहायला मिळेल. शेड्यूल 10 प्रमाणे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आमदार असतील, त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. घटनात्मक पेचप्रसंग आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष नाही, तर संपूर्ण देशाचे लक्ष आहे", असे नाना पटोले यांनी म्हटले.

मिसेस फडणवीस म्हटल्यात, 'ते वेश बदलून जायचे'

नाना पटोले यांनी भाजपसह (BJP) देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच फटाकरलं. महाराष्ट्रात सत्ता नाट्य झालं. शाहू-फुले-आंबेडकर विचारांना न भूषणारं होतं. त्या सत्ता नाट्यामध्ये स्वतः मिसेस फडणवीस यांनी उल्लेख केलेला आहे की, ते वेश बदलून जात होते. रात्री-बेरात्री जात होते. काल अजित पवार यांनी दिल्लीमध्ये वक्तव्य केले की, ते नाव बदलून विमानानं जायचे. ही सर्व चर्चा माध्यमांसमोर आहे. सत्तेसाठी काहीपण, कुठल्याही लेव्हल जाऊन सत्ता घ्यायची, राज्य लुटायचे, जनतेला लुटायचे, ही जी काही भूमिका भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी असंविधानिकपणे सरकारमध्ये बसून सुरू केली आहे, त्यांना आता जनता माफ करणार नाही, अशी परिस्थिती असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला.

जागा वाटप लवकरच...

महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीचा जोराची तयारी सुरू आहे. पुढील महिन्यात जागा वाटपाच्या चर्चा सुरू होतील. तशा काही जागांचा विषय फायनल झाला आहे. जागा वाटपासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतोय. ताबडतोब चर्चा करावी, ही काँग्रेसची भूमिका आहे. या भूमिकेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सहमत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT