Shinde vs Thackeray : ठाकरे बंधू मराठी भाषेनिमित्ताने एकत्र आले. याचा सर्वाधिक धसका महायुतीमधील भाजप अन् शिवसेनेने घेतल्याचे आता दिसू लागले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी विजयी मेळाव्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर शिंदेंची बाजू भक्कमपणे मांडणारे पत्र मंत्री प्रताप सरनाईक यांनी लिहिल्याचे आता समोर आलं आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वैचारिक वारसदार एकनाथ शिंदे कसे आहेत अन् ठाकरे बंधू केवळ सत्तेसाठी एकत्र आल्याचे खटाटोप मंत्री सरनाईक यांनी पत्राद्वारे केला आहे. या पत्रात शिंदेंच्या समर्थनाथ काय लिहू अन् काय नको? असं मंत्री सरनाईक यांना झाल्याचं दिसते.
मुंबईच्या (Mumbai) वरळी डोम इथं मेळाव्यात ठाकरे बंधूंची पुढची वाटचाल एकत्र असले, असे संकेत देण्यात आले. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘दाढीवरून अर्धा हात फिरवत 2022मध्ये आम्ही उठाव केला होता. तेव्हापासून ते आडवे झाले. त्यातून ते सावरले नाहीत, अजून आडवेच आहेत. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उठेगा नही, हे बोलणे त्यांना शोभत नाही. मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही, अर्ध्या दाढीवरून हात फिरवला तर ही गत झाली, पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता तर काय झाले असते.’
दरम्यान, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनीही पत्राद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना एक भावनिक पत्र लिहित एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची विजयी वाटचाल सुरू झाली असल्याचे नमूद केले.
‘मराठीची टोपी घालून अनेक वर्षे शिवसेना ठाकरे गटाने मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगली; परंतु त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचेच काम केले. या टोपीखाली दडलंय काय तर केवळ स्वार्थ आणि अप्पलपोटेपणा,’ असे परिहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.
कोविड रुग्णांची खिचडी खाऊन गब्बर झालेली ही मंडळी, मिठी नदीतील भ्रष्टाचाराच्या गाळात खोलवर अडकून पडली आहेत. मराठी भाषेचा कैवारी असल्याचा आव आणणाऱ्यांनी मराठीचे जेवढे नुकसान केले, मुंबई तोडण्याचा डाव, असा अपप्रचार करून लोकांची मते लाटली. त्यामुळे पश्चात्ताप मेळावा घेऊन शिवसेना ठाकरे पक्षाने जनतेला माहिती दिली पाहिजे, असे सरनाईक यांनी पत्रात लिहिले आहे.
‘ठाकरे बंधू केवळ सत्तेसाठी एकत्र आले असून एकनाथ शिंदे हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारसदार असून मराठी आणि महाराष्ट्रासाठी झटणारे सच्चे नेते आहेत,’ अशा आशय मांडण्याबरोबरच, मंत्री सरनाईक यांनी महाराष्ट्र व मराठी माणूस आपल्यासोबत असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देत पत्राचा समारोप केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.