Sanjay Raut on Rahul Narwekar
Sanjay Raut on Rahul Narwekar sarkarnama
मुंबई

Sanjay Raut On Rahul Narwekar: राऊतांनी नार्वेकरांना ठणकावलं; म्हणाले,'' दुर्योधनाच्या बाजूने उभे राहणार असाल तर...''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: सर्वोच्च न्यायालयानं १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. यानंतर आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी ठाकरे गटानं आक्रमक रणनीती अवलंबली आहे. तर दुसरीकडे संजय राऊतांकडून नार्वेकरांना लक्ष्य केले जात आहे. आता राऊतांनी दुर्योधनाच्या बाजूने उभे राहणार असाल, तर कायद्याची पदवी पेटीत बंद करून ठेवा अशा शब्दांत खडसावलं आहे. तसेच शिंदे सरकारमुळे महाराष्ट्र दिल्लीच्या दारातले पायपुसणे झाला आहे. त्याला सध्या सरकार जबाबदार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मंगळवारी (दि.१६) मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेसह इतरही राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. राऊत म्हणाले, राहुल नार्वेकर कायद्याचे जाणकार आहेत. ते अनेक वर्ष शिवसेनेचेच वकील होते. शिवसेनेच्या माध्यमातूनच त्यांचे राजकारण पुढे गेले. त्यांना शिवसेना काय आहे हे माहिती आहे. काय घडले आहे, कसे घडवले, हे त्यांना माहिती आहे. त्यांना जर दुर्योधनाच्या बाजूने उभे राहायचे असेल, तर त्यांनी त्यांची कायद्याची पदवी पेटीत बंद करून ठेवावी अशी बोचरी टीका त्यांनी केली.

विधानसभा अध्यक्षांनी ते जाहीर करायचं आहे....

संजय राऊत म्हणाले की, न्याय करणे यापेक्षा न्यायाला विरोध करणे घटनाद्रोह आहे. ज्याच्या हातात न्यायाचा तराजू आहे, त्याने न्यायाला विलंब करणे देशद्रोह असतो. या महाभारतामध्ये श्रीकृष्ण नाही. या महाभारतामध्ये भीम नाही. या महाभारतामध्ये भीष्ण पितामह सुद्धा नाही आहेत. ते सगळे तटस्थपणे पाहत आहेत. त्यांनी लढाई चालू ठेवावी. सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलेले आहे. पोपट मेलेलाच आहे. फक्त विधानसभा अध्यक्षांनी ते जाहीर करायचे आहे असे म्हणत त्यांनी शिंदे गटा(Shinde Group)वर टीका केली.

सरकारमध्ये एकच शहाणा माणूस, बाकी सगळे...

‘महाविकास आघाडीचा पोपट केव्हाच मेला आहे, हे आघाडीच्या नेत्यांनाही कळून चुकले आहे; पण हा पोपट जिवंत आहे. हे आपल्या कार्यकर्त्यांना कळावे म्हणून आघाडीचे नेते बोलत आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केली होती. या टीकेला पलटवार करताना राऊत म्हणाले , मला असे वाटले होते, या अख्ख्या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे. तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. बाकी सगळे अतिशहाणे किंवा मूर्ख आहेत. पण फडणवीसच जर असं बोलायला लागले असतील, तर शहाणपणाच्या व्याख्या आणि भूमिका बदलाव्या लागतील.

...ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत!

संजय राऊत पुढे म्हणाले की, मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की, देवेंद्र फडणीस यांना वकिलीचे चांगले ज्ञान आहे. त्यांना कायदा कळतो, त्यांना प्रशासन कळते. त्यांना राजकारण माहिती आहे. त्यांना पडद्यामागे काय चालले आहे, हे माहिती आहे. ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, तरीही ते अशी वक्तव्ये करत आहेत. म्हणजे मला त्यांची काहीतरी मजबुरी दिसते आहे असंही मत राऊतांनी व्यक्त केलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT