Naresh Mhaske, Eknath Shinde And Devendra Fadnavis
Naresh Mhaske, Eknath Shinde And Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Naresh Mhaske : CM शिंदेंचे नरेश म्हस्के म्हणतात, फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं...

Jagdish Patil

Mumbai News, 17 June : लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होण्याआधीच राज्यात कोकण पदवीधर मतदारसंघावरून वातावरण चांगलेच तापलं होतं. या जागेवर मनसेचे अभिजीत पानसे यांनी दावा करीत उमेदवारी जाहीर केली, तर भाजपने निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली. याच उमेदवारांबाबतचा एक किस्सा शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी प्रचार बैठकीत सांगितला.

अभिजीत पानसे आणि निरंजन डावखरे हे दोन्ही उमेदवार माझ्या जवळचे असल्याने नेमकी कोणाची बाजू घ्यायची हे मला कळत नव्हंतं. माझ्यासमोर मोठं संकट निर्माण झालं होतं. मात्र या संकटातून मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचवलं, असं म्हस्के म्हणाले.

कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र, या मतदारसंघातून सुरुवातीला मनसेकडून अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आपल्यावर मोठं संकट ओढवलं होतं. पण देवेंद्र फडणवीसांमुळे मी संकटातून कसा बचावलो याबाबतचा किस्सा नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी डावखरे यांच्या प्रचारादरम्यान सांगितला.

म्हस्के म्हणाले, "लोकसभेच्या निवडणुकीत अवघ्या 12 दिवसांमध्ये मला महायुतीच्या सर्व घटक पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मेहनत करून निवडून आणलं. खासदारकीनंतर लगेच विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली. निरंजन डावखरेंबरोबर आमचं बोलणं सुरु होतं. अशातच मनसेकडून (MNS) पानसेंची उमेदवारी जाहीर झाली. यावेळी सर्वात पहिलं माझ्या पोटात गोळा आला.

कारण निरंजन आणि अभिजीत हे दोघेही माझे चांगले मित्र. या दोघांनी खासदारकीच्या निवडणुकीत माझं काम केलेलं. निकाल लागून 5 ते 6 दिवस झाले होते. सगळे पत्रकार या दोघांऐवजी माझ्यामागे लागलेले. त्यामुळे मी फोन बंद करुन नाशिकला गेलो. कारण उत्तर काय द्यायचं हा मोठा प्रश्न होता."

शिवाय निरंजनला योग्य म्हटलं तर अभिजीत रागवणार आणि अभिजीतला योग्य म्हटलं तर निरंजनला राग येणार. त्यामुळे मी रवींद्र चव्हाणांना फोन केला आणि हे लवकर मिटवा, असं सांगितलं. शिवाय निरंजनला रोज फोन करुन हा विषय लवकर संपव फडणवीस (Devendra Fadnavis) साहेबांना सांग असं बोलल्याचं म्हस्केंनी सांगितलं.

दरम्यान, या काळात एकदा अभिजीतला फोन करून त्याचं मत परिवर्तन होतंय का तेही पाहिलं. यावेळी अभिजीतला किती नोंदणी केली आहेस? असं विचारलं तर त्यांने निरंजनपेक्षा जास्तीचा आकडा सांगितला. त्यामुळे मला काय करायचं सुचेनास झालं.

दोघेही महायुतीत असल्यामुळे आणि दोघेही जवळचे असल्यामुळे आता काय करायचं हे सुचत नव्हत. परंतु केवळ फडणवीसांनी भूमिका घेतल्यामुळे आपण आज महायुतीत अतिशय सलोख्याने बसलो आहोत. त्यामुळे डावखरेंचा विजय निश्चित असून अद्याप विरोधकांचा उमेदवार कोण आहे, हे देखील कोणाला माहिती नाही, असा टोला म्हस्केंनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT