Thane News : Eknath Shinde : Rajan vichare
Thane News : Eknath Shinde : Rajan vichare Sarkarnama
मुंबई

Thane News : ठाण्यात शिवसेना कोणी वाढवली? : शिंदे-ठाकरे गटात रंगला जोरदार कलगीतुरा!

सरकारनामा ब्यूरो

Thane News : ठाण्यात शिवसेना (Shivsena) ही आमच्यामुळे वाढली आहे, असे म्हणत पूर्ण ठाण्यात शाखेला कुलूप लावायला कार्यकर्ते मिळणार नाही, असा दावा करत शिंदे गटा वारंवार करताना दिसत आहे. शिंदे गटाला जशास तसं उत्तर देण्यासाठी ठाकरे गट सरसावली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख यांनी ठाण्यातील शिवसेना वाढीमध्ये तुमचा वाटा किती असा थेट प्रश्न विचारत २०१४ पासून ठाण्यात शिंदे गटाचा अधोगतीचा पाढा वाचला.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर ठाण्यात वारंवार राजकीय राडे होत आहेत. बॅनरबाजी आणि आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. यात शिंदे गट - ठाकरे गटाचे प्रवक्ते आघाडीवर आहेत. दररोज त्यांच्या विधानावरून नवे वाद निर्माण होत आहेत. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात तुमचा वाटा किती? असा प्रश्न थेट खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटाला विचारला होता. यावर आता शिवसेना ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख मधुकर देशमुख यांनीही प्रश्नांची सरबत्ती मांडून लेखाजोखा करण्याच्या प्रयत्न केला आहे.

१९६६ साली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर १९६७ साली ठाण्याच्या नगरपरिषदेवर भगवा झेंडा फडकला. शिवसेनेचे वसंतराव मराठे ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. १९७४ साली थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे सतिश प्रधान प्रचंड मताधिक्याने निवडून आले. १९८२ साली ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाली. १९८६ साली झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रथम निवडणुकीत शिवसेनेला ठाणेकरांनी, नगरपालिकेत केलेल्या कामाच्या शिदोरीवर महानगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा विजयी केले. सतीश प्रधान ठाणे नगरीचे प्रथम महापौर झाले. त्यावेळी तुमचा राजकीय जन्म तरी झाला होता का ? असा पहिला प्रश्न त्यांनी विचारला आहे.

ठाणे जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, पालघर, शाहपूर, मुरबाड, भिवंडी या आदिवासी बाहूल पट्ट्यात व ठाणे शहरात शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा करिष्मा, सतीश प्रधान, शाबीर शेख, मो. दा. जोशी, गणेश नाईक, आनंद दिघे साहेब, या जिल्हाप्रमुखांनी ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एस टी ने खडतर प्रवास करून ठाणे जिल्ह्याच्या काना कोपर्‍यात शिवसेना वाढविली. तेव्हा तुम्ही कुठे होतात? ठाणेकरांनी १९९३ पासून २०२२ पर्यंत शिवसेनेला सलग १५ महापौर दिले. त्यात तुमचा त्याग, परिश्रम किती ? तुमची भागीदारी किती ? व कशासाठी ? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

आमदारांची संख्या घटली :

२०१४ पर्यंत ठाणे जिल्ह्यात एकूण २४ विधानसभा मतदार संघ होते. तेव्हा २४ पैकी शिवसेनेचे १७ ते १८ आमदार निवडून येत होते. ठाणे जिल्ह्याचे विभाजन घडून आल्यानंतर, पालघर जिल्ह्यात विधानसभेच्या ६ मतदार संघापैकी १ आमदार व ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा क्षेत्रापैकी ६ आमदार निवडून आले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पालघरमध्ये १ आमदार व ठाणे जिल्ह्यात ५ आमदार निवडून आले. म्हणजे २४ पैकी ६ आमदार निवडून आले. तर भारतीय जनता पक्षाचे ८ आमदार निवडून आले होते. मग कोणाच प्राबल्यं वाढल ? मग शिवसेनेची प्रगती झाली की अधोगती ? कोणाचे नेतृत्व होते ? असा प्रश्नही देशमुख यांनी विचारला आहे.

२०१४ पासून अधोगतीच :

२०१४ ला ठाणे मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आला. भाजपचा आमदार झाला, मग यावेळी कोणी केली फंदफितुरी ? कोणी यावेळी केली कट कारस्थान केली? पक्षाची प्रगती झाली की अधोगती ? असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT