Eknath Shinde -Amit Shah Sarkarnama
मुंबई

Maharashtra Political Breaking : निकालाआधीची सर्वात मोठी बातमी! शहा- शिंदेंची रविवारी रात्री मुंबईत गुप्त भेट

सरकारनामा ब्यूरो

संजय परब-

Mumbai News : शिंदे सरकार जाणार की राहणार हे आता बुधवारी (ता.10) ठरणार आहे. विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेना 16 आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देणार आहेत. या निकालाकडे ठाकरे आणि शिंदे गटासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दोन्ही गटाच्या नेतेमंडळींकडून या निकालाबाबत दावे- प्रतिदावे देखील केले जात आहेत. याचवेळी आता विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास पुढचे 8 महिने मीच मुख्यमंत्री राहणार आहे, या शिंदे यांच्या जाहीर वक्तव्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) रविवारी(ता.7) रात्री मुंबईत आले होते. ते वैयक्तिक कामासाठी मुंबईत आले होते, पण हे काम आटोपताच ते आणि शिंदे यांची खास भेट झाल्याचे समजते. बुधवारी जाहीर होणाऱ्या निकालाच्या तोंडावर ही भेट खूप महत्वाची असल्याचे बोलले जाते.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अपात्र आमदारांच्या मुद्द्याचा निकाल देणार असून या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निकालावर शिंदे आणि ठाकरे गटाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. या निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) राजीनामा देतील आणि सर्वोच्च न्यायालयावर निकालाचा निर्णय सोडून देतील, असे सुद्धा बोलले जात होते.

मात्र, यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो. मुख्य म्हणजे शिंदे सरकार अस्थिर होऊन त्याचा मोठा तोटा राज्यातील महायुतीला बसू शकतो. फक्त लोकसभाच नाही तर विधानसभेसह स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना भाजपसह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) (शिवसेना) तसेच अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) यांची प्रचंड कोंडी होऊ शकते आणि हे लक्षात घेऊन निकालाच्या बाबतीत सावध पावले टाकली जाण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे यांचीच शिवसेना खरी असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप हा कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नसल्याचा दावा कदाचित निकालात दिला जाईल आणि शिंदे सरकार वाचले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शक्यतेनुसार हा निकाल शिंदे यांच्या बाजूने गेला तर ठाकरे गट जास्तीत जास्त सर्वोच्च न्यायालयात जाईल. मात्र यामुळे शिंदे सरकार काही कोसळणार नाही. पुढे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत लोकसभा निवडणूक लागेल.

या निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत सहज सहा एक महिने निघून जातील. नंतर पुन्हा विधानसभा निवडणुका लागतील आणि शिंदे नुकतेच म्हणाले, त्याप्रमाणे ते आठ महिने मुख्यमंत्री राहू शकतात.

अमित शहा हे भाजपचे संकटमोचक नेते समजले जातात. भाजप सरकार असो किंवा पक्ष जेव्हा केव्हा संकटात असतात तेव्हा शहा हे भाजपला सहीसलामत बाहेर काढतात, असा त्यांचा लौकिक आहे. आताही 10 जानेवारीचा निकाल बाजूने किंवा विरोधात लागला तरी आपला प्लॅन बी काय असायला पाहिजे, याचा त्यांच्याकडे नक्कीच तोडगा असतो. रविवारी रात्री सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांनी महायुतीचे सरकार कसे वाचवायचे याचा मंत्र दिला असेल.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT