Mumbai News: शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या आक्षेपार्ह विधानावरून राज्यभर पेटलेल्या आंदोलनाचा आता भडका उडू लागला आहे. अशातच भिडेंना अटक करा नाही, तर मीच त्यांचा खून करेन, असे खळबळजनक विधान करत राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी याबद्दलचे पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिले आहे.
भिडेंचे विधान, त्यावरचा आक्षेप, आंदोलनाचा सपाटा, विधानसभेतील गोंधळ आणि आता सावजी यांनी केलेल्या विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलने सुरू असून राज्यभरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.
आता माजी मंत्री सुबोध सावजी यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. सुबोध सावजी यांनी पत्राद्वारे फडणवीसांकडे केलेल्या मागणीबद्दल त्यांनी व्हिडिओद्वारे माहितीही दिली आहे.
सुबोध सावजी व्हिडिओमध्ये म्हणतात की,"संभाजी भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे आपण व्यथित झालो असून त्यांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी, अन्यथा माझ्या हातून त्यांचा मर्डर झाल्यास गृहमंत्री फडणवीस जबाबदार राहतील", असा इशारा सावजी यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अमरावतीत एका कार्यक्रमादरम्यान संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यभरातून जोरदार टीका होत आहे. आता सावजी यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.