Uddhav Thackeray :  Sarkarnamam
मुंबई

Uddhav Thackeray On Modi : ''...तेव्हा तुम्ही इंडियाचे पंतप्रधान म्हणून जातात की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक ?''; ठाकरेंचा मोदींवर पलटवार

सरकारनामा ब्यूरो

Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाच्या आघाडीची तुलना ईस्ट इंडिया कंपनीसोबत केली होती. फक्त इंडिया नाव लावलं म्हणून सर्वकाही होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीने सुद्धा इंडिया नाव लावलं होतं. इंडियन मुजाहिदीनच्या नावातही इंडिया आहे अशी बोचरी टीका मोदी यांनी केली होती.

या टीकेला आता शिवसेने(उध्दव बाळासाहेब ठाकरे)चे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी तुम्ही परदेशात जातात बायडनला मिठ्या मारता, तेव्हा तुम्ही इंडियाचे पंतप्रधान म्हणून जातात की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून जाता? असा खोचक सवाल उपस्थित केला आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात संयुक्त मेळावा मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांनी मोदी - शाह, फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, होय आम्ही विरोधीपक्ष आहोत. आणि भारत मातेच्या हातात आम्ही कुणालाही बेड्या घालू देणार नाही. पण मोदी तुम्ही परदेशात जातात, जो बायडनला मिठ्या मारता, तेव्हा तुम्ही इंडियाचे पंतप्रधान म्हणून जातात की मुजाहिद्दीनचे सेवक म्हणून जाता? असा खोचक सवाल उपस्थित केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काळानुसार काही भूमिका घ्याव्या लागतात. मी भाजप(BJP)ला आज आव्हान देतो, आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही. आम्हाला अतिरेक्यांना बडवणारा हवा. जगातील सर्वात शक्तिमान नेता, विश्वगुरु राज्य करत असताना हिंदूंना जनआक्रोश करावा लागत आहे. मी भाजपची साथ सोडली, पण हिंदुत्व नाही सोडलं. 9 वर्षात शक्तिमान असलेला नेता असताना हिंदू खतरे मे है अशा घोषणा येत असतील तर काय उपयोग अशा शब्दांत ठाकरेंनी भाजपला खडे बोल सुनावले.

''...तरी उद्धव ठाकरेंना संपवू शकत नाही!''

मित्र म्हणून तर तुम्ही पाठीत खंजीर खुपसत असाल, तर कोथळा काढावा लागेल. ही अफझल खानाची स्वारी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्यावर हल्ला चढवला. भाजप अख्खा उभा राहिला तरी उद्धव ठाकरेंना संपवू शकत नाही, असेही उध्दव ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितले.

यावेळी रक्षाबंधन मुस्लिम भगिनीकडून करून घ्या असे मोदींनी आपल्या खासदाराना सांगितले, पण हिंमत असेल मणिपूरच्या भगिनींकडून बांधून घ्या. जर राखी बांधून घ्यायची असेल तर बिल्किस बानोकडून घ्या असा टोलाही उध्दव ठाकरेंनी यावेळी लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT