Yeshwant Jadhav BMC
Yeshwant Jadhav BMC Sarkarnama
मुंबई

हे पहिल्यांदाच घडतय : स्थायीच्या अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महापालिकेची निवडणूक (BMC) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना स्थायी समिती (Standing Committee) अध्यक्ष यशवंत जाधव (Yeshwant Jadhav) यांच्याविरोधात भाजपने (BJP)अविश्‍वासाचा ठराव मांडला आहे. पुढील आठवड्यात मंगळवारी (ता.१८ जानेवारी) होणाऱ्या महासभेच्या कामकाजात या ठरावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. इतिहासात पहिल्यांदा स्थायी समिती अध्यक्षांविरोधात अविश्‍वासाचा ठराव मांडण्यात आला आहे.

महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला असून कायदे, नियमांचे पालन न होता स्थायी समितीचे कामकाज करण्यात येते, असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी केला आहे. त्यामुळे जाधव यांच्याविरोधात अविश्‍वासाचा ठराव मांडण्याबाबत महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना पत्र दिल्याचे शिंदेंनी सांगितले. कोरोना काळात महापालिका प्रशासनाला खर्चाचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, या खर्चाची माहिती १५ दिवसांत स्थायी समितीपुढे सादर करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात काही महिन्यांनंतर ही माहिती सादर केली जाते. ती माहितीही अपुरी असते, हा आक्षेप भाजपने वेळोवेळी नोंदवला आहे. आता शालेय विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी केले जात आहेत. त्या खरेदीबाबतची माहिती पूर्ण दिलेली नाही. तसेच, २०१७ मध्ये झालेल्या खरेदीपेक्षा दुप्पट दराने ही खरेदी होत आहे. त्याचबरोबर कोणतेही कंत्राट ठराविक कंत्राटदारांना वारंवार मिळू नये, त्यासाठी वर्तमानपत्र, संकेत स्थळावर जाहिरात द्यावी, असा नियम आहे. त्याचेही पालन होत नाही. अशा अनेक मुद्द्यांवर प्रशासन भ्रष्टाचार करत असून त्यात सत्ताधारी म्हणून शिवसेनाही सहभागी आहे. त्यामुळे हा अविश्‍वासाचा ठराव मांडण्यात आल्याचे शिंदेंनी सांगितले.

खासगी लॅबने कमावले ६२ कोटी

पावसाळी आजारांची औषधे, चाचणी किट्स खरेदी करण्याचा प्रस्ताव महापौर पेडणेकरांना पाठविण्यात आला होता. त्यावर आठ महिन्यांत निर्णय झाला नाही. त्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी स्मरणपत्र पाठविण्यात आले. त्यावरही उत्तरे आली नाहीत. किट्सची खरेदी लांबल्यामुळे सुमारे साडे चार लाख सामान्य नागरिकांना खासगी प्रयोग शाळांमधून तपासणी करावी लागली. त्यातून खासगी लॅब चालकांनी ६० ते ६२ कोटी रुपयांची कमाई केली, असा आरोपही शिंदेंनी केला आहे.

शुक्रवारी महासभेत दहा प्रस्ताव बैठकीच्या आदल्या रात्री नगरसेवकांना पाठवण्यात आले. अनेक सदस्यांना हे प्रस्ताव मिळालेले नसताना त्यातील दोन प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. याबाबत बोलतांना यशवंत जाधव म्हणाले की, महापालिका, स्थायी समितीचे कामकाज नियमानुसार सुरू आहे. सर्व सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाते. कामकाजादरम्यान सर्व नियम पाळले जात आहे. अविश्‍वासाचा ठराव मांडणे हा विरोधकांचा अधिकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT