Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : 'पक्षांतरबंदी' समितीवर नार्वेकरांची निवड होताच उद्धव ठाकरेंचा संताप

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Politics : पक्षांतरबंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली आहे. या निवडीवरून विरोधक भाजपसह नार्वेकरांवर जोरदार टीका करत आहेत. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आघाडीवर आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या खास शैलीत या निवडीवर मत व्यक्त केले.

उद्धव ठाकरेंनी देशाच्या पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक, हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का? असा थेट प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला.

ते म्हणाले, 'महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडवून जो उफराटा निर्णय नार्वेकरांनी (Rahul Narwekar) दिला त्याचे वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात केले आहे. आता त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहोत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतानाच ही नेमणूक करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल,' अशीही टीका ठाकरेंनी केली.

ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपवर टीका करताना म्हटले, 'आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत, आम्ही म्हणू तेच संविधान आणि म्हणू तोच कायदा, यापुढे देशात असेल. असे म्हणणारे कोणीही असले तरी त्याला डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल. अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल,' अशीही भिती ठाकरेंनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यानंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी राहुल नार्वेकरांसमोर झाली. त्यानंतर त्यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा दिला. यावेळी त्यांनी अनेकदा दहाव्या परिशिष्टाचा आणि यातील तरतुदींचा उल्लेख केला होता. आता याच कायद्याची चिकित्सा करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्याची शक्यता आहे.

पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात घटनेच्या 10 व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून नार्वेकरांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी जोरदार टीका केली. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तत्त्व आणि नैतिकतेला मूठमाती देऊन जी व्यक्ती सर्व पक्षांसोबत घरोबा करून आलेली आहे, त्याला यापदी नेमणे म्हणजे संविधानिक मूल्यांची थट्टा आहे. त्यामुळे ही संशोधन समिती लोकप्रतिनिधींची काय चिकित्सा करणार, असा थेट सवालही आव्हाडांनी उपस्थित केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT