Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Eknath Shinde sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray On Fadnavis: ''...तर लोकं उद्या मोदींप्रमाणेच फडणवीसांच्या डिग्रीवरही संशय घ्यायला लागतील !''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: गेल्या ११ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी(दि.११) निकाल दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निकालात राज्यपालांच्या निर्णयावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले, व्हिप, प्रतोद नियुक्तीवरुन शिंदे गटाला फटकारलं असलं तरी सरकार तरलं आहे. या न्यायालयाच्या निर्णयावर राजकीय क्षेत्रातून उलटसुलट प्रतिकिया उमटत आहे. याचवेळी सत्ताधारी पक्षाकडून निकालावर समाधान व्यक्त केल जात आहे. मात्र, ठाकरे गटानं या निकालावरुनच शिंदे गट व देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी मुंबईतील आपल्या पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्याच बाजूने कसा आहे हे पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कोर्टाने घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाहय केललं आहे. काहीजण पराभवाचे फटाके फोडतायत असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावला. तर ज्यांनी खुर्चीसाठी भाजपाला दगा दिला तेव्हा नैतिकता कुठे गेली होती? नैतिकतेच्या गोष्टी ठाकरेंनी करू नये असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

तसेच उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांनी लाज आणि भीतीपोटी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. लज्जेपोटी उद्धव ठाकरे यांनी पद सोडले अशी बोचरी टीकाही केली होती. यावर आता शिवसेने(उध्दव बाळासाहेब ठाकरे)चं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

'सामना'त काय म्हटलं?

फडणवीस हे वकील आहेत. ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने राजकीय सोयीचा अर्थ निकालातून काढत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या डिग्रीप्रमाणे फडणवीस यांच्या वकिलीच्या डिग्रीवरही लोक उद्या संशय घ्यायला लागतील असा टोला लगावला आहे.

राज्यपालांनी बहुमत चाचणीचा दिलेला निर्णयच गैर ठरला आणि तरीही त्यातून निर्माण झालेले सरकार सत्तेवर बसणार असेल तर ती लबाडी आहे. या लबाडीची वकिली देवेंद्र फडणवीस करीत आहेत. ते गृहमंत्री आहेत. ते राज्याचे विधी आणि न्याय खात्याचेही मंत्री आहेत. याचा अर्थ सुप्रीम कोर्टाचा निकाल काही लागला तरी आम्ही आमच्या पद्धतीने त्या निकालाचा अर्थ काढू व खुर्च्यांना चिकटून बसू असा हल्लाबोलही सामनातून केला आहे

...पण न्याय मेलेला नाही!

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या बाबतीत जो निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने दिला त्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. सरन्यायाधीश चंद्रचूड हे रामशास्त्री बाण्यानेच वागले आणि बेडरपणे त्यांनी जे निकालपत्र वाचन केले त्यातून एक स्पष्ट झाले ते म्हणजे, राजकारण, सत्ताकारण, घटनात्मक संस्था मारल्या असतील, पण न्याय मेलेला नाही! असंही ठाकरे गटानं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)ने परखडपणे सांगितले की, ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा स्वखुशीने दिला. त्यांनी राजीनामा दिला नसता तर मुख्यमंत्रीपदावर त्यांची पुनर्स्थापना करणे शक्य झाले असते. हे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. याचाच अर्थ आजचे मुख्यमंत्री व त्यांचे सरकार बेकायदेशीर ठरवले.

''शिंदे-फडणवीस चेहऱ्यावर गुलाबी मेकअप...''

आज महाराष्ट्रातले सरकार पूर्णपणे ‘अपात्र’, घटनाबाहय़ ठरले तरी शिंदे-फडणवीस चेहऱ्यावर गुलाबी मेकअप करून सांगत आहेत, ”आम्हीच जिंकलो!” आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेतील, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले हे खरेच, पण यांचा गटनेता बेकायदेशीर, व्हिप बेकायदेशीर आणि त्याचे सरकारला मतदान करण्याचे आदेशच बेकायदेशीर. अशावेळी कायदे पंडित असलेले विधानसभा अध्यक्ष कायद्याची व संविधानाची हत्या करून सरकारला वाचविणार आहेत काय? असा सवालही ठाकरे गटानं सामनाच्या अग्रलेखात उपस्थित केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT