Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

BJP Vs Shivsena UBT : उद्धव ठाकरे दिल्लीत काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत, भाजप नेत्याची बोचरी टीका

Jagdish Patil

Mumbai News, 07 August : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या याच दौऱ्यावर काल शिवसेना शिंदे गटाने टिका केली होती. तर आता भाजपनेही ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ठाकरे दिल्लीला महाराष्ट्राच्या शेतकरी, महिला, तरुण किंवा मराठा आरक्षण या विषयासंदर्भात गेलेले नाहीत, तर 'मला मुख्यमंत्री करा' हे काँग्रेसला सांगायला गेले आहेत. ते दिल्लीत काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शेलार (Ashish Shelar) म्हणाले, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला शासकीय बैठकीला किंवा नीती आयोगाच्या बैठकीला, तसंच महाराष्ट्राच्या हिताचा निधी आणायला गेल्यानंतर त्यांच्यावर उद्धव ठाकरे घरी बसून टीका करतात. 'मुख्यमंत्री दिल्लीला गुडघे टेकायला गेले, दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालायला गेलेत.

सह्याद्री दिल्ली समोर झुकणार नाही, मराठी माणूस दिल्लीसमोर वाकणार नाही.' अशी विधाने करणारे उद्धव ठाकरे आता दिल्लीतील काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत का? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी होय तुम्ही दिल्लीतला काँग्रेसवाल्यांची भांडी घासायलाच ते गेला आहेत, हा आमचा आरोप असल्याचंही शेलार म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे दिल्लीला राज्याच्या हितासाठी गेले नसल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्लीत महाराष्ट्राच्या हितासाठी गेले नाहीत. तिथे जाऊन महाराष्ट्रातील युवकांना रोजगार आणू, अथवा अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आहे. राज्य शासनाने मदत केली पण अधिकची मदत केंद्राकडे मागू, अशा कुठल्याही विषयावर ना निवेदन, ना कुठली बैठक ना चर्चा. तसेच महिला भगिनींच्या विषयांमध्ये काही बैठक अथवा निवेदन सुध्दा घेऊन ते गेलेले नाहीत."

शिवाय त्यांच्या घरासमोर जेव्हा मराठा आरक्षण आंदोलक आले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, मराठा आरक्षणासाठी दिल्लीला निर्णय घेतला पाहिजे. मग दिल्लीला जाताना आरक्षणाबाबत एखादे निवेदन घेऊन का गेला नाही? ठाकरे हे ना आरक्षणाच्या बाजूने ना महाराष्ट्राच्या बाजूने आहेत, ते दिल्लीला गेले तो कटोरा घेऊन गेले आहेत. आणि काँग्रेसच्या दिल्लीश्वरांची भांडी घासायला गेले आहेत. ते कशासाठी तर मला मुख्यमंत्री पदाची खुर्ची द्या, मला मुख्यमंत्री बनवा.. मला जास्त जागा द्या, माझ्या पक्षाचा विचार करा, अशा मागणीसाठी ते दिल्लीत गेले आहेत. अशी बोचरी टीका शेलार यांनी केली.

यावेळी त्यांनी ठाकरेंनी बांगलादेशच्या मुद्द्यावरुन मोदींना टोला लगावणाऱ्या ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, दिल्लीत जाऊन बांगलादेशचा मुद्दा काढला, हिंदूंचा विषय काढला. पण मुंबईत धारावीमध्ये हिंदू कार्यकर्त्याचा खून झाला, उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीचा दाऊद नावाच्या आरोपीने खून केला. तुम्ही घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या धारावीत आणि उरणला ही गेला नाहीत, मग आमच्या नेत्यांना ढाक्याला जायचे सल्ले कसले देताय? असा सवाल ठाकरेंना विचारला.

महाविकास आघाडी फुटणार...

महाविकास आघाडीचे नेते एकमेकांचे फोन घ्यायला तयार नाहीत, आघाडीमध्ये तिकीट वाटप, जागा वाटप, अशा कोणत्याही मुद्द्यावर एकमत दिसत नाही. काँग्रेसचे प्रभारी आहेत त्यांना संजय राऊत पत्रकार परिषदेत ओढत होते. हळूहळू हे एकमेकांना ठोसे मारतील. त्यामुळे जागा वाटपाच्या वेळीच महाविकास आघाडी फुटणार असल्याचं भाकीतही त्यांनी यावेळी केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT