Uddhav Thackeray -Raj Thackeray  Sarkarnama
मुंबई

Uddhav And Raj Thackeray News : उध्दव - राज यांच्या 'फोनाफोनी'चा दुसरा अंक ; नऊ वर्षांनी 'शिवतीर्था'वर खणखणणार 'मातोश्री'चा फोन !

Deepak Kulkarni

Mumbai : फोडीफोडीच्या राजकारणातून कोण कोणाला कधी टाळी देईन. राजकीय सोयरीक जुळवून कोणी कधी कोणाच्या मांडीला मांडी लावून बसेन; याचा खरोखरीच नेमच नाही. राजकारणापलीकडे जाऊन एकमेकांचा पाणउतारा करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातही आता समेट होणार का, नवी आघाडी उभी राहणार का यावरही राजकीय वर्तुळात चर्चा झडू लागल्या आहेत.

त्याला आता निमित्त आहे...उद्धव-राज यांच्यातील फोनाफोनीचे. खरे तर या दोघांमधील फोनाफोनीचे आधीचे रामायण अजूनही चर्चेत आहे. तेव्हा नव्या फोनाफोनीच्या नाट्यात काय दडले आहे, हे ठाऊक नाही. पण यानिमित्ताने खुद्द राज यांनी सांगितलेला फोनाफोनाची किस्सा नेमका काय आहे, हे पुन्हा पाहता येईन.

उद्धव ठाकरे - राज ठाकरे(Uddhav Thackeray) यांना फोन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा फोन ठाकरे गट- मनसे युतीसाठी नाहीतर बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात असणार आहे. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे संग्रहित केली होती. 1966 ते 1990 या काळातील बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं श्रीकांत ठाकरे यांनी ग्रामोफोनमध्ये रेकॉर्ड केली होती.

त्यावेळी टीव्ही नव्हता. त्यामुळे ग्रामोफोनमध्ये ती भाषणं रेकॉर्ड करण्यात आली होती. ती भाषणे राज ठाकरे यांच्याकडे आहेत. याच भाषणांसाठी उद्धव राज यांना फोन करण्याची शक्यता आहे.मात्र, या फोनच्या निमित्ताने आता पुन्हा एकदा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी घडलेल्या फोनाफोनीचा किस्सा परत चर्चेत आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे( Raj Thackeray) यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी घडलेला किस्सा सांगितला होता. यात त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मनसेचा कसा केसानं गळा कापण्याचा प्रयत्न केला असल्याचं वक्तव्य केलं होतं.

ठाकरे नेमकं काय म्हणाले होते..?

मला आजही ती तारीख आठवते. 23 सप्टेंबर 2014ला उद्धवचा फोन आला. तो म्हणाला, आपल्या दोघांना भेटायला पाहिजे. एकत्र बोलायला पाहिजे. त्यानुसार बाळा नांदगावकरला बोलावून घेतले. मी त्याला उध्दव आणि माझ्यातील संभाषण सांगितले. मी त्याला उद्धवकडे जायला सांगितले. त्यानुसार बाळा आणि शिरीष सावंत यांच्यासह काही मंडळींनी राजगडवर आम्ही एकत्रित बसून जागावाटपाविषयी मसुदा तयार केला. बाळा नांदगावकर तर त्यादिवशी रात्रभर जागा होता.

24 सप्टेंबर 2014 ला सकाळी बाजीराव दांगट, देशमुख व माझ्यात पुन्हा चर्चा झाली. ते दोघे शिवसेनेकडून निरोप घेऊन आले होते. त्यावेळी मी उद्धवशी बोललो. त्यानुसार चर्चा झाली. तो म्हणाला, माझ्याकडून अनिल देसाई बोलतील. मी म्हणालो, आमच्याकडून बाळा नांदगावकर बोलतील. यावर आम्ही दोघांनीही सहमती दर्शविली. 26 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. (MNS - Shivsena)

बाळाने अनिल देसाईंना फोन केला. त्यानुसार त्यांनी उद्धव ठाकरेंशी बोलून सांगतो असे सांगितले. 25 सप्टेंबरला पुन्हा नांदगावकरांनी देसाईंना फोन केला तर ते म्हणाले,बोलतो आणि सांगतो. 25 तारखेला मी बाळाला बोलावून घेतले. आमच्या उमेदवारांना देण्यासाठीचे एबी फॉर्म तयार होते. सर्व एबी फॉर्मवर बाळाच्या सह्या होत्या. महाराष्ट्रभरातील उमेदवार फॉर्मची वाट पाहत होते. मी म्हणालो, काय झाले. तेव्हा बाळा म्हणाला, देसाई म्हणालेत, भेटतो बोलतो, पण अजून काहीच नाही असे सांगितले आहे. त्यानुसार मी बाळाला एबी फॉर्म वाटप करण्यास सांगितले. मात्र, त्याने तसे केले नाही. देसाईंच्या निरोपाची वाट पाहिली. एबी फॉर्म थांबवले.

त्यावेळी बाळा निवडणूक लढवणार की नाही हे स्पष्ट नव्हते. मात्र, मी बाळा नांदगावकराला निवडणूक लढवायला सांगितले. त्याच्या एकट्याच्या एबी फॉर्मवर माझी सही होती. आम्ही 26 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत फॉर्म भरले. आम्हाला या बाबीचे वाईट वाटले. याचा अर्थ आम्ही भाजपबरोबर जाऊ नये यासाठी खेळलेले ते राजकारण होते. उध्दवनी गोड बोलून गळा कापण्याचा प्रयत्न केला असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT