Republic day
Republic day  Sarkarnama
मुंबई

Republic Day : '' हुकूमशाही मानसिकता असणाऱ्या लोकांच्या हाती सध्या देशाचं प्रजासत्ताक..''; ठाकरेंचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray On Modi Government : देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र साजरा होत आहे. मात्र, याचवेळी केंद्रातील मोदी सरकारवर सामनातून शिवसेनेनं ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) निशाणा साधला आहे.

निवडक लोक तुपाशी आणि बहुसंख्य जनता उपाशी, असे भेसूर चित्र प्रजासत्ताक दिनी दिसत असले तरी भविष्यात बदल घडवावाच लागेल. मूठभरांसाठी काम करणारी सत्ता उलथवून खरेखुरे जनतेचे राज्य यावं यासाठी देशातील प्रजेलाच आता एकजूट दाखवावी लागेल अशी भूमिका मांडतानाच हुकूमशाही मानसिकता असणाऱ्या लोकांच्या हाती आज देशाचं प्रजासत्ताक सापडलं आहे असा हल्लाबोलही उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेनं सामनातून करण्यात केला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेखातून सातत्यानं मोदी सरकार, भाजप आणि शिंदेगटावर ताशेरे ओढण्यात येत असतात.

यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ठाकरे गटानं सामनातून देशातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील विषमतेवर बोट ठेवलं आहे. यावेळी हिंदुस्थानातील केवळ २१ धनाढ्य अब्जाधीशांकडे सध्या देशातील ७० कोटी लोकांपेक्षा अधिक संपत्ती आहे. हिंदुस्थानातील तरुण वर्ग बेरोजगारीने ग्रासलेला आहे. नोकऱ्यांसाठी वणवण भटकतो आहे, शेतीचा खर्च आणि शेतमालाचा भाव यांचा कुठेच मेळ बसत नसल्यानं शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि दुसरीकडे अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये मात्र दररोज साडेतीन हजार कोटी रुपयांची वाढ होत आहे असा हल्लाबोल करण्यात आला आहे.

देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र साजरा होईल. शाळा, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह जरूर ओसंडून वगैरे वाहताना दिसेल, पण ज्या कारणासाठी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, त्या सामान्य प्रजेला, शेतकऱ्यांना, गोरगरीब शेतमजुरांना, कामगार-कष्टकऱ्यांना, बेरोजगार तरुणांना ही प्रजेची सत्ता आहे, असे खरोखरच वाटते आहे काय? प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाचा आनंद गाव, खेडी, तांडे, वस्त्यांवरील गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावर दिसतो आहे का?असा प्रश्नही ठाकरे गटानं (Uddhav Thackeray) उपस्थित केला आहे.

देशात खरोखरच प्रजेची सत्ता अस्तित्वात आहे का? आपल्या देशात खरोखरच प्रजेची सत्ता अस्तित्वात आहे, असे कसे म्हणता येईल? हरित क्रांती आली, औद्योगिक क्रांती आली, वैज्ञानिक क्रांतीचे लाभ आणि आधुनिकीकरण असे चांगले बदल निश्चितच झाले.

तथापि, या बदलांचा मोठा लाभ कुणाला झाला? केवळ मुंबई, दिल्ली, बंगलोर, कोलकाता येथील उंच टॉवर आणि चमकधमक म्हणजेच काही हिंदुस्थान नव्हे! या महानगरांच्या पलीकडे जो खंडप्राय देश पसरला आहे, तेथील जनतेचे काय? देशातील श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब आणखी गरीब! ही विषमतेची व्यवस्था म्हणजे प्रजासत्ताक देश म्हणावे काय? अशा विविध प्रश्नांना शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून वाचा फोडली आहे.

राज्यघटना स्वीकारली तो दिवस म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. त्या घटनेप्रमाणेच हा देश चालेल, असा शब्द देऊन आपण राज्यघटना स्वीकारली, पण आज देशात घटनेप्रमाणे एखादे तरी काम सुरू आहे काय? घटनेने न्यायपालिका, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक वगैरे संस्थांना दिलेली स्वायत्तता विद्यमान सरकारला मान्य नाही. सगळीकडे ताटाखालचीच मांजरे हवीत आणि सरकारी हुकमांना ‘होयबा’ म्हणणारे लोक हवेत, अशी हुकूमशाही मानसिकता असणाऱ्या लोकांच्या हाती आज देशाचे प्रजासत्ताक सापडले आहे अशी घणाघाती टीकाही सामनातून करण्यात आली आहे.

घटनाविरोधी कारवाया करून विरोधी पक्षांची सरकारे उलथविली जातात, घटनाबाहय़ सरकारे आणली जातात. पक्षपाती निर्णय घेऊन एका राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळवले जातात. या दडपशाहीलाच प्रजासत्ताक म्हणावे काय?” असं सामनाच्या अग्रलेखाद्वारे म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT