Ujjwal Nikam News Sarkarnama
मुंबई

Ujjwal Nikam News : निवडणुकीत पराभव तरी उज्ज्वल निकमांवर भाजप 'मेहेरबान'; पुन्हा विशेष सरकारी वकील; विरोधक म्हणतात...

Deepak Kulkarni

Mumbai News : भाजपने उत्तर-मध्य मुंबईतून विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. अनपेक्षितपणे त्यांंची उमेदवारी जाहीर करुन मुंबईत भाजपने मोठी खेळी खेळली. पण काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासमोर त्यांचा निभाव काही लागला नाही. आणि भाजपचा डाव उधळून लावताना काँग्रेसच्या गायकवाडांनी विजय खेचून आणला.

पण पराभवानंतरही निकम यांच्यावर भाजप मेहेरबान असल्याचे दिसून येत आहे. कारण उत्तर-मध्य मुंबईतील पराभवानंतरही त्यांची पुन्हा एकदा विशेष सरकारी वकीलपदी वर्णी लागली आहे. महायुती सरकारच्या या निर्णयावर आता काँग्रेसने आक्षेप घेतला असून यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र काँग्रेसकडून सोशल मीडियावरील X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत उज्जवल निकमांच्या नियुक्तीवर शंका उपस्थित केली आहे.महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या निवडीवर थेट भाष्य केले आहे. ते पोस्टमध्ये म्हणतात, राज्य सरकारने न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून पाप केलं, उज्वल निकम भाजपचे लोकसभेचे उमेदवार असताना त्यांना सरकारी वकील करून त्यांनी सिद्ध केलं की सरकारी वकीलही भाजपचे राहणार. पण भाजपच्या उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांविरोधात निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने ही लढत अतिशय प्रतिष्ठेची केली होती.पण आता उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना पराभवाची धूळ चारली.अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीची राहिलेल्या या लढतीत गायकवाड सरस ठरल्या. या पराभवानंतर अवघ्या बाराच दिवसांतच सरकारने त्यांना मेहेरबान होत त्यांची राज्याच्या विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती केली आहे.

बॉम्बस्फोटापासून गाजलेल्या केसेस निकाली लावणाऱ्या आणि आपल्या वकिली स्टाइलने अनेकांना घाम फोडणारे सरकार वकील उज्ज्वल निकमांनाच मुंबईतील लढतीने घाम फोडला.म्हणजे,काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड निकमांशी नव्हेः थेट भाजपशी झुंजल्या आणि जिंकल्याही. पण आता तेच उज्जवल निकम पुन्हा एकदा कोर्टात माय लॉर्ड म्हणताना दिसणार आहे.

वडेट्टीवार - आव्हाड काय म्हणाले..?

उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, निवडणूक लढवून काही दिवस होत नाही, तेवढ्यात त्यांची नियुक्ती करणं हा आतातायीपणा आहे. लोकांच्या भावना यांच्याशी काही देणंघेणं नाही, फक्त सत्ता एवढंच त्यांना हवंय अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, वकिलाच्या कोटवर कुणाचाही शिक्का नसावा,त्यांनी स्वतःहून मागे यायला हवे होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT