Mumbai News : मुंबई 26/11 हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणा याचा भारताला लवकरच ताबा मिळणार आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली आहे.
भारतीय कुटनितीचा आणि नैतिकतेचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक असून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारत करत होती.
मुंबई (Mumbai) हल्ल्यातील मास्टारमाईंड तहव्वूर राणा याच्या वकिलाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडे त्याला भारताकडे प्रत्यार्पण करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाचे पुनर्विचार करण्याची विनंती याचिका 13 नोव्हेंबरला दाखल केली होती. एकाच गुन्ह्यात एका व्यक्तीवर दोन खटले न चालवण्याचा हवाला या याचिकेत देण्यात आला होता. यूएस सॉलिसिटर जनरल यांनी 16 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात याचिका फेटाळण्याची विनंती केली.
राणाच्या वकिलांनी 23 डिसेंबरला यूएस सरकारच्या शिफारशीला आव्हान दिले आणि सर्वोच्च न्यायालयाला (Court) रिट स्वीकारली जावी, यासाठी विनंती केली. ही विनंती मान्य करत न्यायालयाने 17 जानेवारीला या मुद्द्यावर दोन्ही पक्षांची परिषद आयोजित केली आहे. भारताकडे प्रत्यार्पण न करण्याची राणाची ही शेवटची कायदेशीर संधी होती. यात भारताला मोठं यश आलं आहे.
प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध तहव्वूर राणा याचे अपील अमेरिकन न्यायालयाने 15 ऑगस्टलाच फेटाळले होते. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, असे अमेरिकन न्यायालयाने 15 ऑगस्टच्या निर्णयात म्हटले होते. भारताकडे प्रत्यार्पण होऊ नये यासाठी तहव्वूर राणाने अमेरिकेच्या न्यायालयात हेबियस कॉर्पस दाखल केला होता. परंतु लॉस एंजेलिसच्या जिल्हा न्यायालयाने भारताने तहव्वूरच्या प्रत्यार्पणाची मागणी ज्या आरोपांच्या आधारे केली आहे, त्या आरोपांनुसार त्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली जाऊ शकते, असा निर्णय दिला होता.
तहव्वूर राणा हा मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र आहे. हेडली हा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबासोबत काम करत असल्याचे त्याला माहीत होते. हेडलीला मदत करून आणि त्याला आर्थिक मदत देऊन तहव्वूर दहशतवादी संघटनांच्या कारवायांना पाठिंबा देत होता. हेडलीच्या कारवायांसंदर्भात सर्व माहिती राणाकडे होती. मुंबईतील हल्ल्याचे नियोजनाची माहिती होती. राणा हा या संपूर्ण कटाचा एक भाग होता आणि त्याने दहशतवादी हल्ल्यासाठी निधी पुरवल्याचा गुन्हा केल्याचा पूर्ण संशय आहे, असा युक्तिवाद अमेरिकन कोर्टात झाला होता.
2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन लोकांसह एकूण 166 लोक मारले गेले. ज्यात 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 60 तासांहून अधिक काळ मुंबईला वेठीस धरले होते. मुंबईच्या प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करून लोकांची हत्या केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.