Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : '...हाच आहे ठाकरे अन् शिंदेंमधला मोठा फरक !'

सरकारनामा ब्यूरो

भाग्यश्री प्रधान

Kalyan Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिवसेना आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी हा घराणेशाही, एकाधिकारशाहीचा पराभव असल्याची टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदेंवरून प्रश्न उपस्थित केले. या वादात आमदार विश्वनाथ भोईर यांनी उडी घेत थेट उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील फरकच सांगितला.

भोईर म्हणाले, जशी घराणेशाही उद्धव ठाकरे गटाकडे आहे, तशी घराणेशाही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाही. मुख्यमंत्र्यांनी श्रीकांत शिंदे यांना हा वारसा आहे किंवा पक्षाचा नेता आहे, असे कुठेच प्रमोट केलेले नाही. श्रीकांत शिंदे फक्त खासदार आहेत. त्यामुळे याला घराणेशाही बोलता येणार नाही, असेही भोईरांनी स्पष्ट केले. यानंतर त्यांनी संजय राऊतांचाही कडक शब्दांत समाचार घेतला.

अपात्रतेच्या निकालानंतर (Eknath Shinde) एकनाथ शिंदेंनी घराणेशाहीचा अंत झाल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर राऊतांनी, घराणेशाहीचा अंत झाला म्हणतात, मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? श्रीकांत शिंदे मुलगा नाही, हे सिद्ध करा, अशी टीका केली होती. यावर विश्वनाथ भोईरांनी राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'संजय राऊतांनी घराणेशाहीबद्दल बोलूच नये. त्यांचे डोके फिरलेले आहे.'

उद्धव ठाकरे याच कामाचे...

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 13 जानेवारीला कल्याण लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. ठाकरेंच्या या दौऱ्यावर विश्वनाथ भोईरांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे कल्याणमध्ये स्वागत आहेच. आता त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. त्यामुळे त्यांचे आढावा घेणे हे काम आहे. त्यांच्याकडे आता दुसरे काही काम उरलेले नाही, असा टोलाही भोईरांनी ठाकरेंना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याण जिल्हा व्हावा ही मागणी योग्यच...

वाढते शहरीकरण व लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर जलद विकासासाठी कल्याण जिल्हा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत विश्वनाथ भोईरांनी, कल्याणमधील वाढते शहरीकरण व विस्तार पाहता कल्याण स्वतंत्र जिल्हा करण्यात यावा, अशी आमची सर्व आमदारांची मागणी आहे. तसे पत्र मी, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले आहे. सर्व कार्यालये कल्याणमध्ये आहेत. त्यामुळे कल्याण जिल्हा व्हावा ही मागणी योग्यच आहे, असेही भोईरांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT