Nitesh Rane-Deepak Kesarkar
Nitesh Rane-Deepak Kesarkar sarkarnama
मुंबई

केसरकर आणि राणे यांचे जमणार की फडणविसांना डोकेदुखी होणार?

सरकारनामा ब्युरो

मुंबई - पहिल्यांदा राष्ट्रवादी आणि आता शिवसेनेविरोधात बंड पुकारलेले सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी केलेले बंड त्यांच्या सावंतवाडी मतदारसंघातील राजकीय चित्र पाहता त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. त्यांना बंडातून तारण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आता राणे हे केसरकरांना मदत करतील का, यावर मतदारसंघातील चित्र अवलंबून असणार आहे. Political News in Maharashtra

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 37 हून अधिक आमदारांसह बंड केले. आता तर या गटांकडून प्रतिशिवसेना स्थापन करण्याची चर्चा सुरु झाली आहे. या गटाने महत्त्वाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे त्यांचे बंड शमण्याची आणि ते परत येण्याची शक्यता धूसर झाली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी आता थेट शिवसेना नेत्यांना आव्हान देण्यास सुरवात केली आहे.

आमदार केसरकर यांची राजकीय कारकीर्द सावंतवाडी पालिकेतून सुरू झाली. सावंतवाडी शहराच्या विकासाचे रोल मॉडेल त्यांनी सावंतवाडी तालुक्यांसह सर्व मतदारसंघात ठेवीत 2009 मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडणूक जिंकली. त्यावेळी प्रवीण भोसले यांनी बंडखोरी केली; मात्र जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या नारायण राणेंनी केसरकरांना निवडून आणण्याची भूमिका घेतली आणि बहुमताने त्यांना निवडून आणले. त्यानंतर 2014 मध्ये निवडणुकीच्या ऐन तोंडावर बंडाचे निशाण फडकावीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. दुसऱ्यांदाही ते निवडून आले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्यावर गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. याशिवाय अर्थ व वित्त विभाग देखील त्यांच्याकडे सोपविण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देखील त्यांनी सांभाळले. मंत्रिपदाच्या कालावधीत पक्षश्रेष्ठींपेक्षा त्यांचे अधिक चांगले संबंध भाजपाच्या नेत्यांशी जुळले होते.

'चांदा ते बांदा' ही योजना त्यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट होता; परंतु त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा त्यांनी निवडणूक लढविली. यावेळी शिवसेना आणि भाजप युती होती; परंतु भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अध्यक्ष राजन तेलींनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविली. या निवडणुकीत देखील ते विजयी झाले. यापूर्वी मंत्रिपद सांभाळल्यामुळे त्यांना ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा होती; परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग शिवसेनेवर प्रभाव असलेले खासदार विनायक राऊत यांनीच केसरकरांचे मंत्रिपद कापले, असा समज केसरकरांनी करून घेतला. तशा प्रकारची चर्चा देखील सुरू होती. त्यामुळे केसरकर शिवसेनेत नाराज होते. खासदार राऊत आणि त्यांच्यामध्ये सुप्त संघर्ष होता; मात्र तो पडद्यावर कधीच आला नाही.

राणेंबरोबरील वाद

मंत्रिपद न मिळाल्याचे शल्य, खासदार राऊतांबरोबर असलेले मतभेद यामुळेच केसरकर यांनी बंडाचे निशाण फडकावीलेल्या एकनाथ शिंदेंबरोबर जाणे पसंत केले. केसरकर यांनी प्रवेश केल्यानंतर सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका घेतली नसली, तरी त्यांच्यावर जोरदार टीका मात्र झाली. अरुण दूधवडकर, जयेंद्र परुळेकर, राजू शेट्ये यांच्यासह अनेकांनी टीका केली.

केसरकरांच्या भूमिकेमुळे राजकीय अस्थिरता निर्माण होणार आहे. सावंतवाडी मतदारसंघातील अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर भाजपचे सदस्य आहेत. शिवसेनेचे देखील काही प्रमाणात सदस्य निवडून आलेले आहेत; मात्र केसरकरांचा अधिकच प्रभाव हा सावंतवाडी तालुक्यातच आहे. काही प्रमाणात वेंगुर्ले आणि दोडामार्गमध्येही आहे; परंतु तीनही तालुक्यांमध्ये शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे भविष्यातील विधानसभा निवडणुकीत केसरकरांना स्वबळावर निवडणूक लढविणे सोपे जाईल, अशी सध्या स्थिती नाही.

या मतदारसंघात नारायण राणेंची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय या मतदारसंघातील केसरकरांचा प्रवास अडचणीचा ठरण्याची शक्यता जास्त आहे; परंतु गेल्या 2009 ते 2022 या 13 वर्षांत राणे विरुद्ध केसरकर हे राजकीय वैर जिल्ह्याने अनुभवले आहे. राणेंना धोबीपछाड देण्यासाठी केसरकरांनी पावलोपावली प्रयत्न केले आहेत. याशिवाय पालकमंत्री असताना केसरकर आणि राणेंमध्ये अधिकच वितुष्ट निर्माण झाले. त्यातच 2009 मध्ये केसरकरांना निवडून आणण्यात आपण मदत केली, हे राणे वारंवार सांगत असतात. ते कृतघ्न आहेत, अशी टीका देखील सतत करीत असतात. त्यामुळे ते भविष्यात त्यांना मदत करतील का, हा खरा प्रश्न असून, त्यांची भूमिका केसरकरांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

प्रयत्नांची शर्थ

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपकडून राजन तेली, संजू परब हे इच्छुक आहेतच; परंतु राणेंनी अलीकडेच लखम राजे यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आहे. केसरकर आणि फडणवीस यांच्यातील ऋणानुबंध पाहता त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकेल; मात्र राणेंचा कल हाच महत्त्वाचा राहील. सध्या निवडणूक झाली तर शिवसेनेकडे ठोस चेहरा दिसून येत नाही. यापूर्वी शैलेश परब या कार्यकर्त्याने मतदारसंघाची बांधणी केली होती; परंतु आता शिवसेनेला येथे उमेदवार आयात करावा लागेल, अशी स्थिती आहे.

येत्या काळात सावंतवाडी पालिका, वेंगुर्ले पालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. सध्याची परिस्थिती पाहता या मतदारसंघात शिवसेनेसाठी खूप प्रयत्न करावे लागतील, असे चित्र आहे.

सद्यःस्थिती

- केसरकरांच्या भूमिकेमुळे राजकीय अस्थिरता

- राणे कोणाला मदत करतात यावर निकाल अवलंबून

- सावंतवाडीत शिवसेनेकडे चेहरा नाही

- स्थानिक स्वराज्य संस्थच्या निवडणुकीत शिवसेनेची कसोटी लागणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT