Shrigonda Politics
Shrigonda Politics  Sarkarnama
नगर

Shrigonda Politics : श्रीगोंद्याच्या राजकारणात टि्वस्ट; काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षांची मोठी घोषणा; विधानसभा निवडणूक...

सरकारनामा ब्यूरो

संजय काटे

Shrigonda : आम्ही दोन वेळेला थांबलो. ज्यांच्यासाठी थांबलो त्यांना त्याचे काही वाटत नसले तरी यावेळी मात्र समोर कोण आहे याची पर्वा होणार नाही. महाविकास आघाडीची उमेदवारी मागणार आहोत. आम्ही काँग्रेसचे कट्टर सेवक आहोत. कुणीही काहीही चर्चा करीत असले तरी मी आघाडीच्याच उमेदवारीसाठी आग्रही राहणार आहे. नेत्यांना काही अडचण असेल तर अपक्षाचीही तयारी ठेवणार आहे.

अनेक वर्षांपासून मतदारसंघातील मुलभूत प्रश्नही सुटले नसल्यानं माझ्यासाठी नव्हे तर लोकांच्या हितासाठी विधानसभा ताकदीनिशी लढणार असल्याचे स्पष्ट संकेत देत महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं आहे.

आगामी काळात श्रीगोंद्या(Shrigonda)च्या राजकारण चांगलंच तापणार असल्याचं चिन्ह आहेत. नागवडे कुटूंबानं आता मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरु केली आहे. यात अनुराधा नागवडे आघाडीवर होत्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्यांचे पुत्र पृथ्वीराज व दिग्विजय, याशिवाय महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडेही सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नागवडे म्हणाल्या, शिवाजीराव नागवडे(Shivajirao Nagwade) यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व दिलं. लोकांचे प्रपंच उभे करताना त्यांनी कधीही स्वहित पाहिले नाही. त्यांचीच शिकवण घेवून आम्ही राजकारण करत आहोत.

आमच्या कुटूंबाने कधीच कोणाला त्रासही दिला नाही आणि कुणाचे राजकारण संपविण्यासाठी डावपेचही आखले नाहीत. तरीही काही राजकारणी आम्हाला टार्गेट करुन ते चांगले आहेत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. सगळ्यांना लोक चांगले ओळखून आहेत आम्ही कुणाला मदत केली, कोण नागवडेंच्या जीवावर मोठे झाले हे समाजाला माहिती आहे येत्या काळात त्यांना योग्यवेळी त्याच शब्दात उत्तर मिळणार आहे असंही नागवडे म्हणाल्या.

...तर अपक्षाचीही तयारी ठेवणार!

या प्रश्नावर 'अर्थात'च लढणार असे स्पष्ट करीत नागवडे म्हणाल्या, आम्ही दोन वेळेला थांबलो. ज्यांच्यासाठी थांबलो त्यांना त्याचे काही वाटत नसले तरी यावेळी मात्र समोर कोण आहे याची पर्वा होणार नाही. महाविकास आघाडीची उमेदवारी मागणार आहोत. आम्ही काँग्रेस(Congress) चे कट्टर सेवक आहोत. बापुंनी आयुष्यभर कष्ट घेतले. कुणीही काहीही चर्चा करीत असले तरी मी आघाडीच्याच उमेदवारीसाठी आग्रही राहणार आहे. नेत्यांना काही अडचण असेल तर अपक्षाचीही तयारी ठेवणार आहे.

...त्यांना निवडणुकीत उभं राहण्याचाही अधिकार नाही!

मतदारसंघाचा विकास झाल्याचा देखावा केवळ कागदावर आहे. जे हा दावा करतात. त्यांनी एकदा लोकांच्यात जावून सांगितले पाहिजे. रस्ते, वीज, पाणी या समस्याही सोडविता न आलेल्या नेत्यांना आगामी निवडणुकीत उभे राहण्याचाही नैतिक अधिकार नाही. नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्यासाठी पाणीही नाही. त्यांच्या सरकार दरबारी असणाऱ्या समस्यांचे निराकरणही होत नाही. विकास काय असतो व तो कसा करायचा यासाठी आपण ताकदीनिशी विधानसभा लढणार असून सामान्यांचे पाठबळ घेवून यश मिळवणार असल्याचंही नागवडे म्हणाल्या.

पाठीत खंजीर खुपसणारे राजकारण आम्ही...

पृथ्वीराज नागवडे म्हणाले, मतदारसंघात बापुंनी केलेल्या कामांचे आजही लोक दाखले देतात. त्यावेळच्या कामांचा दर्जा आणि बापुंचे राजकारण याबद्दल आपुलकीने लोक बोलले. काही विघ्नसंतोषी लोक आमच्या कुटूंबाबत चुकीची व दिशाभुल करणारी चर्चा घडवून आणतात. आमची आई विधानसभा लढणार या चर्चेचे काहींनी गलिच्छ राजकारण सुरु आहे. वडील व आई संयमी राजकारणाचे पुरस्कर्ते आहेत, मात्र असे पाठीत खंजीर खुपसणारं राजकारण आम्ही खपवून घेणार नसून जशास तसे उत्तर देण्याची तयारी आम्ही ठेवली आहे असल्याची भूमिकाही नागवडे यांनी मांडली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT