Pollution in Nagpur District
Pollution in Nagpur District sarkarnama
नागपूर

Nagpur : कोळशाच्या धुळीचा परिणाम; पिकांत गेलेला पांढरा कुत्रा झाला काळा....

अतुल मेहेरे

नागपूर : एखाद्या शेतात गेलेला पांढऱ्या रंगाचा कुत्रा अर्धा काळा होऊन बाहेर निघाला, असं सांगितलं तर त्यावर कुणाचाही विश्‍वास बसणार नाही. पण, हे खरं आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी तालुक्यातील वराडा मौजा एसंबा येथे कोलवॉशरीमुळे गावावर कोळशाच्या धुळीचे आच्छादन तयार झाले आहे. पिकांवर कोळशाच्या धुळीचे थरच्या थर जमा झाले आहेत. ५०० एकरातील उभी पिके नष्ट झाली आहेत.

या गावात पाहणी करण्यासाठी गेले जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी सांगितले की, आम्ही शेतातून फेरफटका मारून आलो, तर आमचे पांढरे कपडे काळे झाले होते. येवढेच नव्हे तर आमच्यासमोर शेतात गेलेला पांढऱ्या रंगाचा कुत्रा काळा होऊन बाहेर पडला. यावरून कोळशाच्या धुळीने हा परिसर किती व्यापला आहे, हे लक्षात येते.

विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वॉशरी बंद करण्याची नोटीस दिल्यानंतर पंधराच दिवसात ती पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सहकार्य करीत नसल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. गोंडेगाव खाणीतील कोळसा एसंबा येथे वॉश केला जातो. वर्षभरापासून सुरू असलेल्या कोळशाच्या वाहतुकीने सर्व पिके काळी पडली आहेत.

तर दुसरीकडे बोरिंगने पाण्याचा उपसा केला जात आहे. वॉशरीचे पाणी जमिनीत मुरत असल्याने भूगर्भातील पाणीसुद्धा प्रदूषित झाले आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन आणि तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने २० मे २०२२ ला वॉशरी बंद करण्याची नोटीस बजावली होती. सोबतच एमएसईबीला वीज पुरवठा बंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र पंधरा दिवसानंतर प्रदूषण मंडळाने काही शर्ती टाकून पुन्हा वॉशरी सुरू करण्याची परवानगी दिली. त्या शर्ती पूर्ण केल्या की नाही याची खातरजमाही अद्याप करण्यात आलेली नाही.

२८ ला शेतकऱ्यांचे आंदोलन

मोठ्या प्रमाणात वायु आणि जल प्रदूषण होत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी कशी दिली, याचा जाब विचारण्यासाठी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात २८ नोव्हेंबरला शेतकरी प्रदूषण मंडळासमोर धडक आंदोलन करणार आहेत. मंडळाच्या भूमिकेचा निषेधसुद्धा नोंदवण्यात येणार आहे

एका खासगी कोल वॉशरीला वाचवण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी पुढाकार घेत आहे. मोजक्याच शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली. ती देताना कुठलीही नैसर्गिक आपत्ती झाली नसतानासुद्धा शासनाचे निकष लावण्यात आले आहे. वेळ मारून नेण्यासाठी अधिकारी बैठकांचा खेळ करीत आहेत.

- प्रशांत पवार (अध्यक्ष, जय जवान जय किसान संघटना)

कोल वॉशरीमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना पिकपाण्याची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. कुठल्याही शेतकऱ्याची तक्रार नाही. स्वतःच्या हितासाठी प्रशांत पवार काही शेतकऱ्यांना उचकावत आहे. त्यांना शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. आरोप करणे आणि नंतर तडजोडी करणे ही पवार यांच्या कामाची पद्धतच आहे.

- आमदार आशिष जयस्वाल (अध्यक्ष, खनिकर्म महामंडळ)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT