Navi Mumbai : वरच्या लोकांनी परवानगी देऊ दे, एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी आणि घोडे फरार नाही तर बेपत्ता करू असे म्हणत मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ललकारले होते. पण नाईक यांना नवी मुंबई महापालिकेवर गेली 30 वर्षे असलेली निर्विवाद सत्ता कायम ठेवण्यात पुन्हा एकदा यश आले आहे. 111 पैकी भाजपचे 65 नगरसेवक विजयी झाले आहेत. तर शिवसेनेला 42 जागांवर यश मिळाले आहे.
यंदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नाईकांना कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न केला खरा; पण प्रस्थापित नगरसेवकांच्या घरात दोनपेक्षा अधिक उमेदवारी देण्याची भूमिका शिवसेनेच्या अंगलट आली. चुकीचे उमेदवार देऊन प्रतिस्पर्धी उमेदवाराला गृहीत धरल्यामुळे शिवसेनेला पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिकेवरील सत्तेने हुलकावणी दिली.
महापालिका निवडणूक घोषित होण्याआधीच नवी मुंबईत शिंदे समर्थक आणि नाईक समर्थक यांच्यात मनभेद झाले होते. नाईकांविरोधात विधानसभेला प्रचार केलेल्यांना पक्षप्रवेश केल्यामुळे आणि एकमेकांविरोधात केलेल्या आरोपांमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा वाढला होता. तोच दुरावा महायुती दुभंगण्यासाठी कारणीभूत ठरला. नवी मुंबई शहरात तसे महायुती एकत्र लढल्यास विरोधकच नव्हते; परंतु एकमेकांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे भाजपला शिवसेनेच्या रूपाने भक्कम विरोधक मिळाला.
अगदी सुरुवातीपासूनच भाजपने गणेश नाईक यांना उमेदवार निवडीपासून ते प्रचारापर्यंतचे सर्व अधिकार बहाल केले होते. त्यामुळे नाईक यांनी बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदारसंघात अचूक उमेदवारांची निवड केली. शहराचा विकास, नवीन पाण्याची योजना, २० वर्षे न वाढणारे मालमत्ता कर, मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्वसन आदी मुद्यांवर अतिशय शांत डोक्याने प्रचार केला. नवीन चेहऱ्यांना अधिक संधी देण्याचा मोह न करता जुने आणि प्रस्थापित नगरसेवकांना पुन्हा संधी देऊन नाईकांनी राजकीय प्रगल्भतेचे दर्शन घडवले.
ऐरोलीत फारसे नुकसान होण्यासारखी परिस्थिती असतानाही नाईकांचे माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी चार जणांचे पॅनेल निवडून आणून दाखवले. तर शिवसेना ठाकरे पक्षातून शिवसेनेत आलेल्या माजी नगरसेवक एम. के. मढवी कुटुंबीयांना चार जागा देऊनही नाईकांच्या भाजप उमेदवारापुढे पराभव पत्कारावा लागला.
शिवसेनेत (Shivsena) नेमक्या या उलट काम करीत एकाच घरात अधिक उमेदवारी दिली. कोपरखैरणे येथे दुसरा स्थानिक नगरसेवक उमेदवार म्हणून शिवसेनेमध्ये येण्यास इच्छुक असताना माजी नगरसेवक शिवराम पाटील हे आणि त्यांची पत्नी अनिता पाटील नगरसेवक असताना आणखी एक उमेदवारी बहाल केली. सानपाडा येथे स्थानिक नगरसेवक सोमनाथ वास्कर आणि पत्नी कोमल वास्कर हे दोघे नगरसेवक असताना आपल्या घरात तिसरी उमेदवारी घेण्याचा हट्ट वास्कर दाम्पत्याला आत्मघातकी ठरला.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीतील अभूतपूर्व विजयाचे श्रेय जनतेला देत आहे. जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. निवडणुकीत विरोधकांवर केलेल्या टीकेनंतर आता वैर संपले आहे. टीकेची पुनरावृत्ती करायची नाही. उद्यापासून जोमात काम करणार आहोत. शहरातील पुनर्विकासाला वेग देणार आहे.
- गणेश नाईक, वनमंत्री
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.