SRA Project News  Sarkarnama
नवी मुंबई

Mumbai Political News : झोपडपट्टी पुनर्वसनाचा वाद पेटला; गणेश नाईकांविरोधात विजय चौगुलेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Mangesh Mahale

Mumbai Political News : राज्य सरकारमध्ये मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जुंपली आहे. नवी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. यावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

एसआरए म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यांतर्गत (१९७१) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यात आले. एसआरए योजना कुठे राबवायची? याचा अधिकार राज्य सरकारला आहे. असं असताना नवी मुंबईतील विविध राजकीय पक्षातील स्थानिक सत्ताधाऱ्यांनी झोपडपट्टीचा प्रश्न गेल्या २८ वर्षांत सोडवला नाही.

नवी मुंबई महापालिकेची स्थापना १९९५ मध्ये झाली. मात्र, झोपडपट्टी पुनर्वसन योजना नवी मुंबईतील राजकारण्यांनी लागू केली नाही. नवी मुंबईत माजी मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी महापौर डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, विधान परिषद आमदार रमेश पाटील इत्यादींनी एसआरए योजना लागू करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत किंवा यासाठी सरकारकडे पाठपुरावा केल्याचे दिसले नाही, असा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ही योजना लागू करण्यासाठी उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले, संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांनी प्रयत्न सुरू केले. वाशी येथील विष्णुदास भावे येथे १५ जुलै २०२३ ला कार्यकर्ता मेळावा झाला. या वेळी नवी मुंबईतील झोपडपट्टीतल्या नागरिकांसाठी एसआरए योजना लागू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबई येथील आपल्या दालनात २४ ऑगस्ट २०२३ ला एसआरएचे सीईओ पराग सोमण, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडको आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यात ही योजना नवी मुंबईत लागू करण्यात आल्याचे जाहीर केले गेले.

ऐरोली चिंचपाडामध्ये गेल्या महिन्यात २१ सप्टेंबरला झोपडपट्टी सर्वेक्षण सुरू करण्यात आले. मात्र, हे सर्वेक्षण माजी मंत्री गणेश नाईक यांच्या दबावामुळे संबंधित अधिकारी यांनी बंद केल्याचा आरोप विजय चौगुले यांनी केला. आता झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या श्रेयावरून वाद रंगला असून, राजकारण सुरू झालं आहे.

नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी गणेश नाईकांविरोधात नाराजी व्यक्त केली. आम्हाला अन्याय सहन होत नाही, आमच्या झोपडपट्टीधारकांना टार्गेट केलं जातंय. महापालिकेतील कामामध्ये अडथळा आणला जातोय. स्थानिक पातळीवर भाजपकडून शिवसैनिकांना डावलण्यात येतंय, असा आरोप विजय चौगुले यांनी केला.

'मुख्यमंत्री आमचे आहेत. आम्ही घाबरणार नाही. वेळ आली तर रस्त्यावर उतरणार. मुख्यमंत्र्यांना याबाबत कल्पना दिलेली आहे. आमचा भाजपवर रोष नाही, वैयक्तिक नेत्यावर आहे. ते युती मानत नाही तर आम्ही का मानू? शांत राहण्याचे आदेश आहेत म्हणून शांत होतो, आता नाही. मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेणार', असं चौगुले म्हणाले.

दुसरीकडे झोपडपट्टी सर्वे सुरू झाला. मात्र, स्थानिक भूमिपुत्रांची घरं कायमस्वरूपी झाली नाहीत म्हणून येथील स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले. हा वाद आता चिघळला असून, थेट नाईक यांच्या दरबारात गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकारण्यांच्या श्रेयामध्ये नक्की फायदा कुणाचा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT