Vilas Lande, Chandrakant Patil
Vilas Lande, Chandrakant Patil sarkarnama
पिंपरी चिंचवड

हे तर मेधा कुलकर्णींच्या मतदारसंघातील आयत्या बिळावर बसलेल्या नागोबाप्रमाणे!

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवार खिशात घालून फिरतात, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकतेच पुण्यात करून मोठा वाद ओढवून घेतला. त्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर लगेच तुटून पडल्या. चंद्रकांतदादा हे राज्याची निखळ करमणूक करीत असल्याने त्यांच्यावर करमणूक कर अर्थमंत्री अजितदादांनी लावावा, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधूनही त्यांच्यावर बुधवारी (ता.२२) हल्लाबोल झाला. अजितदादांवर आरोप करण्याअगोदर पाटलांनी आत्मचिंतन करावे. कारण अशी टीका करण्याची त्यांची अजिबात योग्यता नाही, अशी तोफ भोसरीचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे (Vilas Lande) यांनी आज (ता. २२ सप्टेंबर) डागली. (Vilas Lande criticizes Chandrakant Patil)

पुण्यातील कोथरूड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या आयत्या मतदारसंघात शिरकाव करून विजयी ठरलेले पाटील हे आयत्या बिळावर बसलेल्या नागोबाप्रमाणे राजकीय स्थिरता राखून आहेत. त्यांची अजितदादांवरील टीका म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी असून सत्ता गेल्याची ती खदखद आहे, अशी बोचरी टीका लांडेंनी केली. झेपेल, सोसेल तेवढेच चंद्रकांतदादांनी बोलावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, मराठी बिग बॉसमध्ये अभिजित बिचकुलेनंतर मनोरंजनाची वानवा जाणवत आहे. ही जागा भरून काढण्यासाठी चंद्रकांतदादा यांनी बिग बॉसमध्ये जायला हवे. महाराष्ट्रात मनोरंजनाची कमी ते जाणवू देणार नाही याची मला खात्री आहे, असा उपहास राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला. दरम्यान, आपल्या नेत्यावर एवढी तिखट टीका होऊनही राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्याकडून मात्र तिचा प्रतिवाद लगेच अद्याप करण्यात आला नाही. त्याबद्दल शहर पक्षात आश्चर्य व्यक्त होत आहे.

सरकार बनविण्यात आपयशी ठरलेल्या फडणविसांना खूश करण्यासाठी पाटलांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे, असे लांडे म्हणाले. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा आयता मतदार संघ बळकाऊन स्वतःला बलाड्य राजकीय व्यक्तीमत्व समजणा-या पाटलांचे गेली तीन दशके मंत्रीमंडळात राहून राज्याचे नेतृत्व यशस्वीपणे सांभाळणा-या अजितदादांवर आरोप म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुध्दी’ आहे. ‘आईजीच्या जिवावर बाईजी उधार’ झालेल्या पाटलांचा आरोप म्हणजे शरद पवार साहेबांनी भाजपला सत्तेपासून कोसो दूर ठेवल्यामुळे बाहेर पडणारी खदखद आहे, असे ते म्हणाले.

राज्यात भाजपची सत्ता असताना पाटलांना कोल्हापूर महापालिकेत पक्षाची एकहाती सत्ता आणता आली नाही. केवळ १३  नगरसेवक निवडून आले. त्यामुळे तिकडे आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई अपयशी ठरल्यानंतर त्यांनी पुण्यातील कोथरुड मतदारसंघावर दावा ठोकला. अजित पवार यांना नागरिकांनी सलग सहावेळा विधानसभेवर निवडून दिले आहे. त्यांचे नेतृत्व लोकमान्य आहे. महत्वाच्या पदांवर राहून त्यांनी महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान दिले आहे. त्यांच्यावर बोलण्याअगोदर पाटील यांनी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचे मूल्यमापन करावे. फडणविसांपेक्षा कित्येक पटीने अधिक अजितदादांचे नेतृत्व लोकप्रिय आहे. त्यामुळे उगाच बाष्फळ बडबड करून पाटलांनी स्वतःची खिल्ली उडवून घेऊ नये, अशा शब्दांत लांडे यांनी पाटलांच्या टिकेचा समाचार घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT