Ahmednagar Municipal Corporation Sarkarnama
प्रशासन

Ahmednagar Politics: नगर महापालिकेत प्रशासकीय राज; तारखेच्या गोंधळात महापालिकेची मुदत संपुष्टात

Pradeep Pendhare

Ahmednagar News: महापालिका नगरसेवकांची मुदत 31 डिसेंबरला संपणार, असे गृहित धरले असतानाच 27 डिसेंबरला संपुष्टात आल्याचे पत्र निवडणूक आयोगाकडून महापालिकेत धडकले. यामुळे महापालिका प्रशासन आणि राजकीय पातळीवर गोंधळाची राळ उडाली. या पत्रामुळे महापालिकेतील सत्ताधारी संतापले असून, नगरसचिवांना महापालिकेची मुदत कधी संपणार याची माहिती असायला हवी होती. त्यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार न पडल्यांचे त्यांच्यावर कारवाईसाठी नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी महापौर रोहिणी शेंडगे यांनी सांगितले.

नगर महापालिकेची मुदत बुधवारी (ता.27) संपल्याचे निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला पत्र पाठवले. यानंतर महापालिका प्रशासनाने महापौर यांच्यासह इतर पदाधिकारी यांना पत्राद्वारे निवडणूक आयोगाने महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपुष्टात आणल्याचे कळवले. यामुळे आयोजित केलेली स्थायी समिती आणि महासभा रद्द करण्यात आली. यामुळे सत्ताधारी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा हिरमोड झाला असून, मुदत संपल्याची तारीख न कळवल्याने आक्रमक झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रशासक नियुक्तीबाबत राज्य सरकारकडून अजून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महापालिकेत प्रशासकीय पातळीवर गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या उपसचिवांनी 15 डिसेंबला नगरविकास सचिवांना पत्र पाठवून नगर महापालिकेची मुदत 27 डिसेंबरला संपत असल्याचे कळवले होते.

मात्र, हे पत्र नगरविकास विभागाकडून महापालिकेला प्राप्त झालेले नाही. परंतु त्रयस्थ यंत्रणेकडून महापालिकेची मुदत संपल्याचे पत्र समोर येताच महापालिकेचे सहायक आयुक्त मेहेर लहारे यांनी तसे पदाधिकारी आणि नगरसेवकांना कळवले. यानंतर मात्र मुदतीच्या तारखेवरून राजकीय गदारोळ झाला.

महापालिकेची मुदत 31 डिसेंबरला संपणार असे गणले जात असतानाच निवडणूक आयोगाने पत्र काढून 27 डिसेंबरला मुदत संपुष्टात आल्याचे सांगितले. त्यामुळे नियोजित करण्यात आलेली स्थायी आणि महासभा रद्द झाली आहे. स्थायी समितीचे विषय पत्रिका चार दिवसांपूर्वी तयार करून सभा बोलवली होती. आज महासभा होणार होती. महासभेची विषय पत्रिका देखील आठ दिवसांपूर्वीच तयार केली होती. परंतु दोन्ही सभा रद्द झाल्या. मुदत संपण्याच्या तारखेबाबत नगरसचव अनभिज्ञ राहिल्याने सभा रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली.

महापालिकेत ठाकरे गट आणि अजित पवार गटाची सत्ता आहे. महापौर रोहिणी शेंडगे यांनी आठवड्याभरापूर्वी महासभा घेण्याची जाहीर केले होते. यात कोट्यवधीची कामे विषय पत्रिकेवर प्रस्तावित होती. महापालिकेची मुदत संपत असल्याने आयुक्तांनी 40 टक्के अंदाजपत्रक राखून ठेवले होते. या निधीतील अनेक कामे प्रस्तावित करण्यावरून नगरसेवकांमध्ये वांदग होता. आता कोट्यवधीच्या कामांचा अधिकार आता प्रशासकाकडे जातील.

मुदत संपुष्टात आल्याने स्थायी आणि महासभा रद्द झाली आहे. यावरून सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. नगरसचिवांनी मुदत संपत असल्याची माहिती असायला हवी होती. मुदत संपल्याने सभा बोलावू नका, हे नगरसचिवांनी कळवायला पाहिजे होते. परंतु त्यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही. याबाबत नगरविकास मंत्र्याकडे तक्रार करणार असल्याची भूमिका माजी महापौर रोहिणी शेंडगे यांनी घेतली आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT