shivdeep-lande-ff.jpg
shivdeep-lande-ff.jpg Sarkarnama
प्रशासन

महाराष्ट्रात येऊनही चांगले पोस्टिंग न मिळालेले IPS शिवदीप लांडे पुन्हा बिहारमध्ये

सरकारनामा ब्यूरो : शुक्रवार, 7 जानेवारी 2021

मुंबई : तडफदार IPS अधिकारी म्हणून ओळखले जाणारे शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande) हे पुन्हा बिहारमध्ये जाणार आहेत. महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आलेले लांडे यांना महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत कार्यकारी पोस्टिंग मिळाले नाही. आता पुन्हा मूळ केडर असलेल्या बिहारमध्येते रुजू होतील. त्यांचा महाराष्ट्रातील नियुक्तीचा आज शेवटचा दिवस होता.

मूळचे अकोल्याचे असलेले लांडे हे IPS झाल्यानंतर त्यांना बिहार केडर मिळाले. आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांना आपल्या मूळच्या राज्यात प्रतिनियुक्तीसाठी पाच वर्षांसाठी येता येते. त्यानुसार ते पाच वर्षांपूर्वी आले. सुरवाताली त्यांना अमली पदार्थ नियंत्रण विभागाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांची बढती झाली. दहशतवाद विरोधी पथकात उपमहानिरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्याच वेळी त्यांच्याकडे मनसुख हिरेन खून प्रकरणाचाा आणि अॅटिंलिया येथे स्फोटके ठेवल्याच्या गुन्ह्याचा तपास आला. मात्र हा तपास नंतर राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) देण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन चांगले काम दाखविण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही.

त्यांचा महाराष्ट्रामधील प्रतिनियुक्तीचा शेवटचा दिवस म्हणून त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांची आज भेट घेतली. अनेकांना त्यांनी स्वतः लिहिलेल्या "Women Behind The Lion " या पुस्तकाची प्रत भेट दिली.

गेल्या वर्षी त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. मी Maybe today I'm silent, hurt... but.. (मी सध्या शांत आहे, व्यतिथ आहे..पण) असे त्यांनी म्हटले होते. महाराष्ट्रात त्यांना चांगले पोस्टिंग न मिळाल्याबद्दलची व्यथा तर त्यांनी बोलून दाखवली नव्हती ना, अशी शंका त्या वेळी घेतली होती. बिहारसारख्या राज्यात त्यांच्या कामगिरीने ते देशात गाजले. महाराष्ट्रात मात्र त्यांना त्या मानाने फारसे करता आले नाही, अशी खंत त्यांचे हितचिंतक बोलून दाखवतात.

मूळचे महाराष्ट्रातील अकोला येथील असलेले शिवदीप लांडे हे बिहार केडरचे 2006 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांना महाराष्ट्रात जनतेशी थेट संपर्क असलेल्या पदांवर जसे पोलिस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त किंवा छोट्या शहरांच्या आयुक्त पदावर नेमले जाईल, अशी चर्चा होती.

लांडे यांनी बिहारमध्ये आपल्या कार्यशैलीने खळबळ उडवली होती. त्यांची पहिली पोस्टिंग हे नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे झाली होती. त्यानंतर बिहारची राजधानी असलेल्या पाटणाच्या अधीक्षकपदी नेमणूक झाली. तेथे रोडरोमियो विरोधात त्यांनी कडक कारवाई केली. अशा चुकारांना त्यांनी रस्त्यावरच बेदम चोप दिला. लाच घेणाऱ्या पोलिसाला स्वतःच वेष बदलून पकडून दिले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही त्यांना मोकळीक दिली होती. अशा अनेक बाबींमुळे ते देशभर प्रसिद्ध झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT