MPSC News  Sarkarnama
प्रशासन

MPSC News: एमपीएससीचा मोठा निर्णय: राज्य सेवा मुख्य परीक्षेतून 'हा' विषय वगळला; २०२७ पासून होणार अंमलबजावणी

MPSC Student : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या (गट - अ व ब) स्वरूपात मोठा बदल केला असून, २०२७ च्या परीक्षेपासून ‘वैकल्पिक विषय’ वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या (गट - अ व ब) स्वरूपात मोठा बदल केला असून, २०२७ च्या परीक्षेपासून ‘वैकल्पिक विषय’ वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील इतर राज्यांच्या धर्तीवर मूल्यमापन पद्धतीत अधिक एकसमानता आणि प्रमाणबद्धता आणण्याच्या उद्देशाने आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुख्य परीक्षेचे एकूण गुण १७५० वरून १२५०, तर मुलाखतीसह एकूण गुण २०२५ ऐवजी १५२५ इतके होणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आयोगाच्या परीक्षा नियंत्रक व सह सचिव सरिता बांदेकर-देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब अंतर्गत राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी सध्या उमेदवारांना एका वैकल्पिक विषयाची निवड करावी लागते, ज्याचे प्रत्येकी २५० गुणांचे दोन पेपर (एकूण ५०० गुण) अनिवार्य होते. मात्र, आता २०२७ च्या मुख्य परीक्षेपासून हे दोन्ही पेपर वगळण्यात आले आहेत.

आयोगाने दिलेल्या माहितीनूसार, देशातील तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार यांसारख्या अनेक राज्यांच्या लोकसेवा आयोगांनी त्यांच्या राज्य सेवा मुख्य परीक्षा पद्धतीमधून वैकल्पिक विषय यापूर्वीच वगळले आहेत. त्याऐवजी अधिक एकसमान आणि प्रमाणित मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. याच धर्तीवर सर्व बाबींचा साकल्याने विचार करून एमपीएससीनेही वैकल्पिक विषय वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

या परीक्षांच्या स्वरूपात कोणताही बदल नाही

हा बदल केवळ राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी लागू करण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेकरिता वैकल्पिक विषयांची तरतूद पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहे. तसेच महाराष्ट्र स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा आणि निरीक्षक वैधमापनशास्त्र या सर्व मुख्य परीक्षा प्रचलित योजनेनुसारच घेण्यात येतील; त्यांच्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

अशी असेल सुधारित परीक्षा योजना (२०२७ पासून लागू)

भाषा पेपर १ (मराठी) : ३०० गुण

भाषा पेपर २ (इंग्रजी) : ३०० गुण

निबंध (मराठी किंवा इंग्रजी) : २५० गुण

सामान्य अध्ययन १ ते ४ (चार पेपर) : प्रत्येकी २५० गुण

वैकल्पिक विषय पेपर १ व २ (२६ विषय) : परीक्षेतून वगळण्यात आले

एकूण लेखी परीक्षा (पेपर ३ ते ७) : १२५० गुण

मुलाखत : २७५ गुण

अंतिम एकूण गुण (लेखी + मुलाखत) : १५२५ गुण

-----------------------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT