Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
प्रशासन

Pimpri Chinchwad News : निलंबित लाचखोरांना पिंपरी महापालिकेने पुन्हा घेतले कामावर, फडणवीसांचे नागपूरही चर्चेत आले

उत्तम कुटे- सरकारनामा ब्युरो

Pimpri Chinchwad News : गेल्या पावणेदोन वर्षापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरू आहे. या कालावधीत तेथे मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यातून गेल्या वर्षी तीन, तर यावर्षी चार जण निलंबित झाले आहेत. त्यात गेल्या वर्षी घरी बसविण्यात आलेल्या तिघांसह फसवणुकीसह इतर फौजदारी गुन्ह्यातील सात जणांना महापालिका प्रशासनाने नुकतेच (ता.१७) पुन्हा सेवेत घेतले. परिणामी लाच घेऊनही नोकरी जात नसल्याने शहरातच नाही, तर राज्यातही भ्रष्टाचार वाढतच चालला आहे.

पिंपरी पालिकेने पुन्हा सेवेत घेतलेल्या सात टेटेंड (कलंकित) कर्मचाऱ्यांत आनंदा डोळस हा सफाई कामगारही आहे. त्याला यावर्षीच मार्च महिन्यात निलंबित करण्यात आले होते. बाकीच्या सहांवर गेल्या वर्षी ही कारवाई झाली होती. त्यात लाचखोरीत तीन, तर घोटाळ्याच्या केसमध्ये तिघे आहेत. सातपैकी सर्वाधिक संतोष लांडगे, संजीव राक्षे (दोघेही असिस्टंट हॉर्टिकल्चर सुपरवायझर), मच्छिंद्र कडाळे, भरत पारखी (माळी) हे चार कलंकित कर्मचारी हे उद्यान, आनंदा डोळस आणि दिलीप गायकवाड (दोघेही सफाई कामगार) हे आरोग्य, तर संदीप लबडे (सर्व्हेअर) हा निवडणूक विभागातील आहे. दरम्यान, यावर्षीही आतापर्यंत पाच पालिका अधिकारी, कर्मचारी हे लाचखोरीत घरी गेले असून, सहा महिन्यांच्या निलंबनाच्या कालावधीनंतर पुन्हा त्यांना कामावर घेतले जाणार आहे.

राज्यात २०३ लाचखोर, तर सस्पेंडसुद्धा नाहीत, त्यात सर्वाधिक ५८ गृहमंत्री फडणवीसांच्या होम टाऊन नागूपरमधील लाच घेताना पकडले गेल्यानंतर सबंधित सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्याला निलंबित केले जाते. पण, राज्यात लाच घेऊनही ६ नोव्हेंबरपर्यंत २०३ जणांवर ही कारवाईच झालेली नाही. त्यात सर्वाधिक क्लास तीनचे (८०) असून, १६ क्लास वन अधिकारी आहेत. एसीबीच्या नागपूर रेंजमधील म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम टाऊनमधील राज्यात सर्वाधिक म्हणजे ५८ लाचखोर हे सरकारने सस्पेंड केलेले नाहीत. त्यानंतर मुंबई (३४) आणि पुण्याचा (१७) नंबर लागतो.

१६ जण, तर शिक्षा होऊनही डिसमिस नाही

लाच घेतल्यानंतर सबंधित कर्मचारी, अधिकाऱ्याला निलंबित केले जाते. त्यानंतर त्या गुन्ह्यात शिक्षा झाल्यावर त्याला डिसमिस (बडतर्फ) करण्यात येते. पण, जसा राज्यात लाच घेतल्यानंतर निलंबित न केलेला आकडा मोठा (२०३) आहे, तसाच तो या गुन्ह्यात शिक्षा होऊनही बडतर्फ न झालेल्यांचाही लक्षणीय आहे. लाचखोरीत दोषी ठरलेले असे १६ जण अद्याप सेवेतच आहेत. त्यातही नागपूर आघाडीवर आहे. त्यांच्यासह पुणे एसीबी रेंजमधीलही चार लाचखोरांना शिक्षा होऊनही ते बडतर्फ केलेले नाही. नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रत्येकी दोन, तर नांदेड आणि ठाणे रेंजमधील प्रत्येकी एक यांना राज्य सरकारचे हे संरक्षक कवच दिलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT