Pravin Gedam  Sarkarnama
प्रशासन

Pravin Gedam News : नाशिकसाठी महसूलमंत्री विखेंची 'प्रवीण' चॉइस; डॉ. गेडाम नवे विभागीय आयुक्त

अय्यूब कादरी

Nashik News : कोणताही गाजावाजा न करता धडाकेबाज निर्णय घेणारे 2002 च्या बॅचचे धडाडीचे आयएएस अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांची नाशिक विभागीय आयुक्त पदावर बदली झाली आहे. केंद्र सरकारकडील प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर दिल्लीतून महाराष्ट्रात आलेल्या डॉ. गेडाम यांची कृषी आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. सात महिन्यांच्या आतच त्यांची आता नाशिकला बदली झाली आहे.

डॉ. गेडाम यांची केंद्रात प्रतिनियुक्तीवर बदली झाली होती. तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर ते आयुष्मान भारत योजनेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. ही योजना साकार करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर त्यांना हार्वर्ड विद्यापीठात सार्वजनिक आरोग्य या विषयावर एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तेथून परतल्यानंतर महाराष्ट्रात काही महिने त्यांना नेमणूक मिळाली नव्हती. सात महिन्यांपूर्वी ते पुण्यात कृषी आयुक्त म्हणून रुजू झाले होते.(Pravin Gedam News)

डॉ. प्रवीण गेडाम (Pravin Gedam) यांची आतापर्यंतची कारकीर्द गाजली आहे. जळगाव महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी घरकुल घोटाळा उघडकीस आणला होता. त्यामुळे दिगेगज नेते सुरेश जैन यांना कारागृहात जावे लागले होते. एका अर्थाने या घोटाळ्यामुळेच सुरेश जैन यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्याचे सांगितले जाते.

या घोटाळ्याचा एफआयआर डॉ. गेडाम यांनी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन लिहिला होता. जळगाव येथून त्यांची बदली लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर झाली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये त्यांनी मोठ्या सुधारणा घडवून आणल्या होत्या. कामचुकार कर्मचारी, अधिकाऱ्यांना त्यांनी वठणीवर आणले होते.

लातूर येथून डॉ. गेडाम यांची बदली धाराशिवचे (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्हाधिकारी म्हणून झाली. धाराशिव जिल्ह्यातील त्यांची कारकीर्द प्रचंड गाजली. दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्याची त्यांची योजना यशस्वी झाली होती. रेशनच्या धान्याचे त्यांनी केलेले सामाजिक लेखापरीक्षण राज्यभरात गाजले होते.

शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवण्यात आलेले धान्य आणि पुढे लाभार्थींना वाटप करण्यात आलेल्या धान्याची याद्वारे गोळाबेरीज करण्यात आली होती. धान्य पोहोचले की नाही, याची त्यांनी प्रत्यक्ष लाभार्थींकडे चौकशी केली होती. यातून अनेक रेशन दुकानदारांचे गैरव्यवहार उघडकीस आले होते. त्यानंतर अनेक स्वस्त धान्य दुकानांचे परवाने त्यांनी रद्द केले होते.

त्यानंतर त्यांची पुणे येथे भूजल सर्वेक्षण या विभागात बदली झाली. तेथेही त्यांनी दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सोलापूर जिल्हाधिकारी, परिवहन विभागाचे आयुक्त, नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी वाळू उपसा धोरण ठरवले होते.

परिवहन विभागाचे आयुक्त असताना निरीक्षकांच्या भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी त्यांनी महत्वाचा निर्णय घेतला होता. तेथून प्रतिनियुक्तीवर ते केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झाले होते. महाराष्ट्रात आल्यानंतर आता नाशिकचे विभागीय आय़ुक्त म्हणून त्यांची बदली झाली आहे. शुक्रवारी सायंकाळीच पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT