Teacher and Students Sarkarnama
प्रशासन

Teacher marches : शिक्षण विरोधी निर्णयाच्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक; राज्यभर मोर्चे काढणार

सरकारनामा ब्युरो

Pune News : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेत बाबत 15 मार्च 2024 चा व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा 5 सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय ग्रामीण भागातील व वाडीवस्तीवरील विद्यार्थी, शिक्षण प्रक्रियेवर अन्यायकारक आहेत. त्यामुळे हे दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत, या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा 25 सप्टेंबरला बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.

राज्यातील सर्व शिक्षक संघटनांची (Teacher Assosiation) बैठक पुण्यातील शिक्षक भवन येथे झाली. बैठकीत शासनाच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे राज्यातील 15 हजार शाळांमधील 1 शिक्षक कमी होवून 15 हजार शाळांमधील सुमारे 2 लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. हा शासन निर्णय शासनाने तात्काळ मागे, घ्यावेत असे मत सर्व संघटना प्रतिनिधींनी व्यक्त केले. (Teacher marches News )

या बैठकीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशव जाधव, शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, पुरोगामी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे, किरण पाटील, शिक्षक सेनेचे चिंतामणी वेखंडे, नवनाथ गेंड, अनिल पलांडे, मनोज मराठे, प्रभाकर झोड उपस्थित होते.

बालकांच्या मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिनियम 2009अन्वये शिक्षक निश्चितीचे निकष सन 2011 पासून आपल्या राज्यात लागू करून 13 वर्षे झाली तरी अद्याप अधिनियमातील तरतुदीनुसार प्राथमिक स्तर इयत्ता 1 ते 5 व उच्च प्राथमिक स्तर 6 ते 8 हा आकृतीबंध अध्याप लागू केलेला नाही. आकृतीबंध लागू करण्याबाबत शासन निर्णयही झाले आहेत. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या अधिनियमाचे उल्लंघन होत आहे.

महाराष्ट्र शासनाकडून 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयाद्वारे शिक्षक निश्चितीचे जाहीर केलेले निकष हे ग्रामीण भागातील व वाडीवस्तीवरील शाळेतील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत. ग्रामीण गावभागात किंवा वाडीवस्तीवर जन्म झाला म्हणून पटसंख्येअभावी शिक्षक कमी करून तेथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवणे हा त्या विद्यार्थ्यांवर अन्यायच आहे. वाडी-वस्तीवर जन्म झालेल्या विद्यार्थ्यांचा दोष तरी काय? त्याला इतर शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळण्याचा हक्क व अधिकार बालकांच्या मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिनियमाने दिला आहे. तो हक्क शासनास डावलता येणार नाही, असेही मत सर्व उपस्थितांनी व्यक्त केले.

त्यासोबतच यावेळी सतीश कांबळे, यादव पवार, निलेश देशमुख, साजीद अहमद, तुषार पाटील, शहाजी गोरवे, राजू सावकार जाधव, उतरेश्वर मोहलकर, धुकर काटोळे, विकास खांडेकर, पल्लवी गायकवाड, प्रकाश घोळवे, अंकुश काळे, राजकुमार राऊत, संजीव चाफाकरंडे, आबासाहेब टेकाळे, पवन सूर्यवंशी, एस. के. पाटील, संजय जाधव, तुषार पाटील, शशिकांत पोवार आदी सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT