Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray Sarkarnama
प्रशासन

मी देवेंद्रजींना विचारलंय...हमरीतुमरी किती पातळीपर्यंत करायची? : उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अर्थसंकल्प मांडताना संतांची वचनं, शेरोशायरी आलीच पाहिजे का? तो मांडणी हे महत्त्वाचे असते. मला यापूर्वी कधीच सभागृहाचा अनुभव नव्हता. लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या अपेक्षा असतात, त्यांचं आपल्याकडं लक्ष असतं. अर्थसंकल्प मांडताना शेरोशायरी करायची आणि नेमकं विरोधी वागायचं, हे योग्य नाही. किती पातळीपर्यंत हमरीतुमरी करायची? हे मी देवेंद्रजींना विचारलंय. विधानसभा हा कुस्तीचा आखाडा नाही. सभागृहात गोंधळ घालून आपणच आपल्या राज्याची शोभा करतो, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोंधळी सभासदांच्या वागण्यावर भाष्य केले. (Uddhav Thackeray expressed concern over the growing confusion in the legislature)

विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे राज्यातील आमदारांसाठी ‘राज्याचा अर्थसंकल्प-माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात..’ या विषयावर आधारित दोन दिवस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्‌घाटनावेळी ठाकरे यांनी सभागृहातील वाढत्या गोंधळाबाबत चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शाळेची घंटा सोमवारी (ता. ४ ऑक्टोबर) वाजली आणि आज (ता. ५ ऑक्टोबर) आपला वर्ग भरला. आपणही विद्यार्थीच आहोत. आपले मास्तर हे सभापती आणि उपसभापती आहेत.

राज्याचा अर्थसंकल्प मांडला जातो. अर्थसंकल्प म्हणजे ठिपक्यांची रांगोळी असतो. सगळे ठिपके जोडून रांगोळी भरली जाते. ते ठिपके जोडायचं काम हे लोकप्रतिनिधींनी करावं, त्यातून राज्य जोडले जाईल आणि राज्याचा विकास होईल. अर्थसंकल्प मांडताना संतांची वचनं, शेरोशायरी आलीच पाहिजे का? तो मांडणी हे महत्त्वाचे असते. अभ्यास करत योजना आखावी. सभागृहात अर्थसंकल्प कसा मांडावा, हे महत्वाचे आहे. मी मुख्यमंत्री झाल्यावरच मला सभागृहाचा अनुभव आला. सत्तारूढ आणि विरोधी पक्ष असे गट कळले, असे ठाकरे यांनी नमूद केले.

सभागृहातील सदस्यांची वागणूक, संसदीय भाषा व्यवस्थित असायला हवी. मृणाल गोरे यांचं उदाहरण देत मुख्यमंत्री म्हणाले की, त्या विरोधात असताना कशा वागायच्या. पण, हल्ली उथळपणाच जास्त होतोय. नुसताच खळखळाट केला जातोय. विचाराला खोली नसेल, तर त्याचा उपयोग काय? पाणी उथळ असण्याला काही एक अर्थ नाही. भाषेवर प्रभूत्व नसेल तरी बोलण्याची शैली उत्तम असावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

कोविडकाळात आरोग्य सुविधांवर सर्वाधिक खर्च

सरकार म्हणून आपण ठरवतो, तसे होते का, तर नाही. गेल्या दीड वर्षात आम्ही ठरवतोय, त्याच्या उलटंच होत आहे. आरोग्य सुविधांकडे पूर्वी दुर्लक्ष झाले. मात्र, कोरोना महामारीची साथ आल्यावर केवळ आपलीच नाही, तर जगाची दाणादाण उडाली. पण, मला अभिमान आहे की या काळात जगात कुठेही नसेल इतकी चांगली आरोग्य सुविधा आपण निर्माण करून ती रुग्णांना दिली. तिसरी लाट येऊ नये, अशी प्रार्थना करतो आहे. पण, या प्रार्थनेला प्रयत्नांचे बळ हवे. कोविड काळात निर्माण केलेल्या सुविधांची देखभाल करायला हवी. या काळात आरोग्य सुविधांवर सर्वाधिक खर्च केलाय. कारण, नागरिकांचे जीव वाचविणे महत्वाचे होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT