Uttar Pradesh News : महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्यासाठी घोटाळेबाजांकडून अनेक क्लुप्त्या लढवल्याचे उघडकीस आले आहे. पण उत्तर प्रदेशातील एका घोटाळ्याने प्रशासन चक्रावून गेले आहे. सरकार योजनेतील पैसे लाटण्यासाठी भावाने बहिणीशी विवाह केल्याचे समोर आले आहे.
उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री सामुहिक विवाह योजनेत हा घोटाळा झाला आहे. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर या कथित घोटाळ्याची चौकशी प्रशासनाने सुरू केली आहे. राज्यातील हाथरसमध्ये हा प्रकार घडला आहे. त्याचप्रमाणे याच योजनेतून पैशांसाठी काही जोडप्यांनी पुनर्विवाह केल्याचेही उघडकीस आले आहे.
योजनेअंतर्गत सामुहिक विवाह करणाऱ्या जोडप्यांना संसारासाठी आवश्यक साहित्यासाठी 10 हजार रुपये, विवाहाच्या खर्चासाठी सहा हजार रुपये अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे नवविवाहितेच्या बँक खात्यात 35 हजार रुपये जमा केले जातात. एकूण 51 हजार रुपये एका विवाहासाठी सरकारकडून दिले जातात.
योजनेतील या पैशांसाठी भावा-बहिणीने विवाह केल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनीच प्रशासनाकडे केली आहे. तसेच दोन जोडप्यांनी पुनर्विवाह केल्याची तक्रार प्रशासनाकडे आली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
ज्या विवाह सोहळ्यामध्ये हे विवाह झाले, त्याचे आयोजन नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यानेच केल्याचे समोर आले आहे. बोगस विवाह लावून देत योजनेतील अनुदान लाटण्याचा हा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विवाह सोहळा मागील वर्षी 15 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये 217 जोडप्यांचे विवाह झाले होते. त्यामुळे आता प्रशासनाकडून या सर्व जोडप्यांच्या विवाहाची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.